मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
पृथ्वीवरून झेपावलेल्या चांद्रयान ३च्या ‘विक्रम’ लँडरने २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग केलं. या यशस्वी लँडिंगसह भारताने नवा इतिहास घडवला, इस्रोने जाहीर केलेल्या वेळेवर संध्याकाळी सहा वाजून चार मिनिटांनी चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागाला स्पर्श करत असतानाच सोहळा पाहणाऱ्या कोट्यवधी भारतीयांचा उर अभिमानाने भरून आला. एकीकडे संपूर्ण देशभरात ही मोहीम फत्ते झाल्याचा आनंद साजरा झाला तर दुसरीकडे या मोहिमेवर चित्रपट बनवण्याचे वृत्त समोर आले आहे. ‘मिशन मंगल’ या चित्रपटाचे दिग्दर्शक जगन शक्ती यांनी ‘चांद्रयान 3’च्या यशाला मोठ्या पडद्यावर दाखवण्याची घोषणा केली आहे.
एका वेबसाटइला दिलेल्या मुलाखतीत जगन शक्ती यांनी सांगितलं की, ते या संधीच नक्कीच सोनं करतील. यासोबतच त्यांनी असंही सांगितलं की ‘चांद्रयान३’ मोहिमेवर बनवणाऱ्या चित्रपटात ‘ मिशन मंगल’ मधील कलाकारांचीच वर्णी लागू शकते. मिशन मंगल या चित्रपटात अक्षय कुमारसोबत विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नू, क्रिती कुल्हारी यांसारख्या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. त्यामुळे ‘चांद्रयान३’ वरील चित्रपटसुद्धा अक्षय मुख्य भूमिकेत झळकण्याची शक्यता आहे.