जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
महाराष्ट्रात उन्हाचा कहर दिवसेंदिवस वाढतच आहे. शुक्रवारी देखील अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेने यावर्षी एप्रिल महिन्यात रेकॉर्ड तोडले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, पुढील चार ते पाच दिवस कमी अधिक प्रमाणात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. तर आज जळगाव शहरातील तापमान ४४ अंशावर पोहचले आहे. म्हणून उष्माघातापासून बचाव करण्यासाठी सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन वारंवार हवामान विभाग आणि प्रशासनाकडून केले जातेय.
उत्तर भारतातून एकामागून एक उष्णतेच्या लाटा निर्माण होत असलेल्या उष्णतेच्या तीव्रतेने नागरिक हैराण झाले आहेत. तर राज्यासह जळगाव जिल्हा देखील रोजच टप्प्याटप्प्याने तापमानात वाढ होत आहे. पश्चिम राजस्थानमध्ये उष्णतेच्या लाटेची स्थिती तीव्र झाली आहे. त्यामुळे आगामी दोन ते चार दिवसात दोन ते चार अंशांनी वाढ होण्याची शक्यता असून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात तापमान वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवले आहे. राज्यासह जिल्ह्यात कमाल तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत दोन ते चार अंशांनी वाढले आहे.
गेल्या आठवड्यात रविवार २४ एप्रिल रोजी चाळीसगाव ४१ अंश वगळता जिल्ह्यात सर्वच शहरातील तापमान ४५ ते ४७ अंशांच्या दरम्यान नोंदवले गेले आहे. तर काल शुक्रवारी दिवसभरात भुसावळ, जळगाव ४६.४ अंश, बोदवड ४३ अंश, भडगाव ४५ अंश, चोपडा, धरणगाव, फैजपुर, जामनेर, मुक्ताईनगर, रावेर, वरणगाव, यावल ४६ अंश, पारोळा ४५ अंश, पाचोरा ४४ अंश तापमान नोंदवले गेले आहे.
आगामी काळात देखील जळगाव जिल्ह्यात तापमान ४३ ते ४६ अंश दरम्यान तापमान राहण्याची शक्यता असल्याचे वेलनेस वेदर फाऊंडेशनचे हवामान अभ्यासक निलेश पवार यांनी म्हटले आहे.