तीन हजार तांड्यांवर बंजारा समाजाचे धर्मांतर; सर्वांना पुन्हा हिंदू धर्मात आणणार – पू. बाबूसिंगजी महाराज

0

बंजारा समाज विश्वव्यापी ; आम्ही सर्व सनातनी हिंदूच – गुरु शरणानंद

लोकशाही न्युज नेटवर्क
अ. भा.हिंदू गोर बंजारा व लबाना नायकडा समाज कुंभाची आज २५ जानेवारी पासून सुरुवात झाली. यावेळी व्यासपीठावर पू. संत बाबूंसिंग महाराज (मुख्य गादीपती पोहरागड), मा. शरदराव ढोले अ. भा. धर्म जागरण प्रमुख, पू. महामंडलेश्वर गुरू शरणानंद महाराज, पू. संत गोपाल चैतन्य महाराज, संत सुरेश महाराज, संत देनाभगतजी महाराज, संत यशवंत महाराज, संत जितेंद्रनाथ महाराज, आचार्य साहेबराव शास्त्री, महंत संग्रामसिंग महाराज, संत रायसिंग महाराज आदी संत व्यासपीठावर उपस्थित होते. आठ राज्यात ११ हजार तांड्यावर प्रत्यक्ष संपर्क करून ३ हजार तांड्यावर ख्रिस्ती मिशनरीकडून बंजारा बांधवांचे धर्मांतर झाले आहे. त्या सर्व बांधवांना पुन्हा सनातन हिंदू धर्मात परत आणणार आहोत. हिंदू गोर बंजारा व लबाना नायकडा समाज जागृत करण्यासाठी व समाजाला दिशा देण्यासाठी कुंभ आयोजित असल्याचे पू. संत बाबूसिंगजी महाराज यांनी सांगितले. धर्म सभेत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

यावेळी मंचावर असलेल्या श्री बालाजी भगवान, गुरुनानक देवजी साहेब, भारत माता आणि संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरवात झाली.

यावेळी अ.भा. धर्मजागरण चे प्रमुख शरदराव ढोले यांनी मार्गदर्शन करतांना देशाचे वैभव पाहून परकीय आक्रमणे झाली. ज्या ग्रीकांनी आक्रमण केले होते ते हिंदू झाले. इस्लामचे आक्रमण वेगळे होते. ते क्रूर होते तलवारीच्या जोरावर लाखो लोकांचे धर्मांतरण त्यांनी केले. इसाई द्वारा छल , कपट आणि सेवेच्या माध्यमातून धर्मांतरण सुरु झाले. हे धर्मांतरण पूजा पद्धती पुरते मर्यादित न राहता वेगळे राज्य आणि वेगळा देशाच्या मागणीने सुरु झाले. पूर्वांचल मध्ये ७ पैकी ४ राज्यांमध्ये ख्रिस्तीकरण झाले. ११ हजार बंजारा तांड्यापैकी ३ हजार तांड्यांचे धर्मांतरण झाले आहे. बंजारा समाजाचे धर्मांतरण होऊ नये यासाठी तसेच धर्मांतरण थांबविण्यासाठी शेकडो संत येथे आले असल्याचे त्यांनी सांगतिले.

संत गोपाळ चैतन्य महाराज यांनी आपल्या आशीर्वचन करताना कुंभात सर्व महापुरुषांना आमंत्रित केले आहे. संत समाज धर्म रक्षणाचे काम करतो. ३ हजार गावात धर्म परिवर्तन झाले आहे म्हणून कुंभाची गरज पडली आहे. हिंदू समाजात जागृती होण्यासाठी आणि धर्म रक्षणासाठी हा कुंभ आहे असे सांगितले. संत बाबूसिंग महाराज यांनी आपल्या मार्गदर्शनात बंजारा समाजाच्या कुंभात मथुरेहून संत उपस्थित राहिले आहेत. कर्नाटक , महाराष्ट्र , गुजरात आदी राज्यातील समाज आणि संत कुंभात सहभागी झाले आहेत.

गोर बंजारा व लबाना नायकडा समाजात महान संत घडून गेले आहेत. समाज संघटित होण्यासाठी हा कुंभ आहे. भक्ती मार्गातून दिशा मिळते. समाजाला जागृत करण्यासाठी संत व्यासपिठावर उपस्थित झाले आहेत. बंजारा समाजाचा प्रथम कुंभ गोद्री येथे होत असून हा ऐतिहासिक व अविस्मरणीय क्षण असल्याचे त्यांनी सांगितले. संत सुरेश महाराज यांनी आपल्या मार्गदर्शनात भारत मातेला आपण माता म्हणतो. आम्ही सनातनी आहोत आणि सनातनी राहू. सीमेवर सैनिक देश आणि भारत मातेच्या संरक्षणासाठी उभा असतो तर धर्मासाठी संत समाजात उभे असतात असे त्यांनी सांगितले. तर पू. महामंडलेश्वर शरणानंद महाराज यांनी प्रतिपादन करतांना बंजारा समाज हा व्यापक आहे. हा समाज व्यापारी होता. बंजारा समाज देशभर पसरलेला असून धार्मिक आहे. संत हाथिराम बाबा हे तिरुपती बालाजी यांच्या सोबत चौकट खेळत असत त्यामुळे बालाजी भगवान आणि हातीराम बाबा आपले श्रद्धास्थान आहेत असे सांगत त्यांनी उपस्थितांन आध्यात्मिक मार्गदर्शन केले.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.