जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
अधिक मास हा पुरुषोत्तम मास म्हणून अत्यंत पवित्र महिना मानला जातो. हिंदू धर्मात या महिन्याचे विशेष महत्त्व आहे. महिनाभर पूजा, देवाची भक्ती, उपवास, जप आणि योग असे धार्मिक कार्य केले जातात. असे मानले जाते की अधिकामासात केलेले धार्मिक कार्य इतर कोणत्याही महिन्यात केलेल्या उपासनेपेक्षा दहा पट अधिक फळ देते. त्यानिमित्ताने बळीराम पेठ महिला मंडळ द्वारे साईबाबा मंदिरात विष्णुसहस्त्रनाम, गीता पठण, श्री सूक्त असा रोज एक तासाचा कार्यक्रम घेण्यात आला. या नामजपाने वातावरण अगदी भक्तिमय झाले होते. या धार्मिक कार्यात नियमित 30 पेक्षा जास्त महिलांचा सहभाग होता.
या एक महिन्याच्या नियमित कार्यक्रमानंतर अमावस्येच्या एक दिवस आधी 56 भोग प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसादामध्ये महिलांनी घरी बनवलेले पदार्थ ठेवण्यात आले होते. तसेच यावेळी महाआरतीचे देखील आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. बळीराम पेठ महिला मंडळाद्वारे अशा प्रकारचे अनेक धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात. या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती असते.