लोकशाही न्यूज नेटवर्क
धानोरा ता. चोपडा (प्रतिनिधी) सध्या आगीचा हंगाम सुरु असुन सातपुड्या मध्ये मोठ्या प्रमाणावर आगी लागत असल्याचे दिसून आले आहे. ह्या आगी प्रामुख्याने वनांमध्ये जाऊन डिंक संकलन करणे, ग्रामस्थ वनांमध्ये फिरण्यास तसेच डिंकाचे झाडांपर्यंत पोहोचण्यात अडचण होऊ नये म्हणून, तसेच वनहक्क धारक व वनांमध्ये कायदेशीर बेकायदेशीररित्या वास्तव्यास असलेले लोक, रस्ते, पाऊलवाटा तसेच रात्रीच्या वेळी जाताना रस्ते दिसत नाही म्हणून किंवा वन्य प्राण्यांच्या भीतीने सुद्धा वनांमध्ये आगी लावल्या जातात.
वनांमध्ये लागलेल्या आगीमध्ये सार्वजनिक वनसंपत्तीचे तसेच पर्यावरणाचे अपरिमित हानी होत आहे. त्यातील गवत झुडपे व काही प्रमाणात झाडे सुद्धा जाळली जात आहेत. परिणामी त्या ठिकाणचे जीव, जंतू सुद्धा नष्ट होत आहेत. एकंदरीतच वनाला लागलेल्या आगीमुळे वनजमिनीवरील वृक्ष आच्छादन कमी होऊन जमिनीची धूप होवुन माती वाहून जाते तलाव, धरण त्यातील माती वाहून जाणे व एकंदरीतच त्याचा विपरीत नापिकी, पाणीटंचाई तसेच वनांतील वन्य प्राणी गावांमध्ये येऊन मानवाला वन्यजीव संघर्ष अशा समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
वन ही राष्ट्रीय संपत्ती असल्याने ते जतन करण्याची प्रत्येक नागरिकांचे आद्यकर्तव्य आहे. वनाला लागून असलेल्या गावातील विशेष करून पेसा गावातील ग्रामसभेचा गौण वनोपज म्हणजे वनातील डिंक, फळे आणि फुले आदी यावर संकलन करणे, वापरणे, विल्लेवाट लावणे अशा प्रकारचा हक्क आहे. हक्का प्रमाणे वनांचे संरक्षण करण्याची जबाबदारी सुद्धा आहे. आग लागल्यानंतर विझवण्यासाठी मदत मागितल्यावर बऱ्याच वेळा ग्रामस्थांकडून मदत मिळत नाही व सातपुडासारखा दुर्गम क्षेत्रातील एकाच वेळेस ठिकठिकाणी लागलेल्या आगी कर्मचारी आणि मजूर यांच्याकडून वेळेत विझवली जात नाही. सातपुडा पुरता नष्ट होत असुन याकडे वनधिकार्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे वनप्रेमींकडुन खंत व्यक्त केली जात आहे