लोकशाही न्यूज नेटवर्क
गोंदिया : तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव आता ओसरू लागला असून, जिल्ह्यातून कोरोनाचा परतीचा प्रवास सुरू झाल्याचे दिसत आहे. कारण, ३०० वर गेलेली बाधितांची संख्या आता ५० च्या आत आली आहे. शिवाय, कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने जिल्ह्यातील सात तालुके आता ‘अंडर फिफ्टी’मध्ये आले आहेत. कोरोनामुक्तीच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू झाल्याचे दिसत आहे.
डिसेंबर महिन्याच्या शेवटपासून कोरोनाची तिसरी लाट आपला जोर दाखवू लागली होती व त्याचे पडसाद जिल्ह्यातही दिसले. नियंत्रणात असलेली कोरोनाबाधितांची संख्या अचानकच वाढू लागली. जानेवारी महिन्यात बाधितांची संख्या झपाट्याने वाढत गेली व हा आकडा ३०० वर गेला होता. त्या काळात ॲक्टिव्ह रुग्ण संख्याही २००० च्या घरात आली होती. दिलासादायक बाब म्हणजे, तिसऱ्या लाटेतील विषाणू कमकुवत असल्याने बाधितांपेक्षा मात करणाऱ्यांची संख्या जास्त होती.
परिणामी, जिल्ह्यात अव्यवस्था झाली नाही. आता मात्र तिसरी लाट ओसरू लागली असल्याचे दिसत आहे. कारण, बाधितांचा आकडा आता ५० पेक्षाही कमी झाल्याचे मागील ४-५ दिवसांत बघावयास मिळत आहे.
विशेष म्हणजे, बाधितांची संख्या कमी व मात करणारे त्यापेक्षा दुप्पट- तिप्पट असे समीकरण झाल्याने सध्या जिल्ह्यात फक्त १६४ ॲक्टिव्ह रुग्ण उरले आहेत.
यामध्ये तब्बल सात तालुक्यांतील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या ५० च्या आता असून, पाच तालुक्यांतील संख्या २० च्या आत आहे. एकंदर त्यांची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू असून अशीच स्थिती असल्यास येत्या २-४ दिवसांत काही तालुके नक्कीच कोरोनामुक्त होणार, यात शंका वाटत नाही. मात्र, गोंदिया तालुक्यात सर्वाधिक ६२ रुग्ण आहेत.
८१२ चाचण्यांत फक्त १४ बाधित
– जिल्ह्यातून कोरोना आता आपला काढता पाय घेत असल्याने दिलासा मिळाला आहे. त्यात बाधितांची संख्या कमी असल्याने ‘सोने पे सुहागा’ झाला आहे. शनिवारी जिल्ह्यात ८१२ चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये २५६ आरटी-पीसीआर, तर ५५६ रॅपिड ॲंटिजन असून फक्त १४ पॉझिटिव्ह आल्या आहेत.