धक्कादायक.. SBI च्या तिजोरीतून तब्बल 11 कोटींची नाणी लंपास

0

जयपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

जयपूर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एसबीआयच्या शाखेतून पैसे चोरीला गेल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. राजस्थानमधील मेहंदीपूर बालाजी येथील एसबीआय शाखेच्या तिजोरीतून 11 कोटी रुपयांची नाणी गायब झाली. सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे. यासंदर्भात अधिकाऱ्यांनी सोमवारी माहिती दिली.

विशेष म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाने या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीसाठी राजस्थान उच्च न्यायालयात धाव घेतली होती. राजस्थान उच्च न्यायालयाने हा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. आता सीबीआयने हे प्रकरण स्वत:च्या हातात घेत तपास सुरू केला आहे. गायब झालेली रक्कम 11 कोटींहून अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे.

असा झाला उलगडा

प्राथमिक तपासानंतर एसबीआयने या नाण्यांची मोजणी सुरू केली तेव्हा एसबीआय शाखेतून नाण्यांच्या चोरीचे प्रकरण उघडकीस आले. यादरम्यान बँकेतील रोख रकमेची हेराफेरी झाल्याचे निदर्शनास आले. जयपूरमधील एका खासगी कंत्राटदाराला 13 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची नाणी मोजण्याची जबाबदारी देण्यात आली होती.

FIR नोंदवला

या मोजणीदरम्यान शाखेतून 11 कोटींहून अधिक किमतीची नाणी गायब झाल्याचे आढळून आले. या तपासणीत आतापर्यंत केवळ 3000 नाण्यांनी भरलेल्या पिशव्या म्हणजेच 2 कोटी किमतीच्या नाण्यांचा हिशेब समोर आला आहे. ते आरबीआयच्या कॉईन होल्डिंग शाखेत जमा करण्यात आले आहे. म्हणजेच एसबीआयच्या शाखेतून 11 कोटी रुपयांची नाणी गायब आहेत.

यानंतर एसबीआयने एफआयआर दाखल केला. या FIR मध्ये असे सांगण्यात आले आहे की, 10 ऑगस्ट 2021 रोजी गेस्टहाऊसमध्ये नाण्यांचे ऑडिट करणाऱ्या कर्मचाऱ्यांना धमकावण्यात आले आणि नाणी मोजण्यापासून दूर राहण्यास सांगण्यात आले. मात्र, हे प्रकरण आता सीबीआयच्या हाती असून तपासानंतरच निर्णय समोर येईल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.