नवी दिल्ली ;- गुजरात सरकारने बिल्किस बानो सामुहिक बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणातील दोषींची खेळलेली सुटका सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविली असून त्यांना पुन्हा तुरुंगात पाठविण्याचे आदेश दिले आहे.तसेच यासाठी दोन आठवड्यांचा अल्टिमेटमही दिला आहे. यामुळे गुजरात सरकारला मोठा झटका बसला आहे. न्या. बीव्ही नागरत्न आणि न्या. उज्ज्वल भुइया यांच्या खंडपीठानं सोमवारी हा निर्णय दिला. यामध्ये कोर्टानं म्हटलं की, शिक्षा गुन्हे रोखण्यासाठी दिली जाते, पीडितेला होत असलेल्या त्रासाचा देखील आपण विचार करायला हवा.
न्यायमूर्ती नागरत्न यांनी तत्वज्ञ प्लेटोचा दाखला देताना म्हटलं की, “शिक्षा ही बदल्यासाठी नव्हे तर सुधारणेसाठी असते. क्युरेटिव्ह थिअरीमध्ये शिक्षेची तुलना उपचाराशी केली जाते. जर कुठल्या गुन्हेगारावर उपचार शक्य असेल तर त्याची मुक्तता केली जाऊ शकते. हा सुधारणात्मक सिद्धांताचा आधार आहे. पण पीडितेचे अधिकारही महत्वाचे आहेत. प्रत्येक महिला सन्मानाला पात्र आहे, महिलांसंदर्भातील इतर गुन्ह्यांमध्ये सूट दिली जाऊ शकते का? असा सवालही कोर्टानं यावेळी केला.