मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
‘बिग बॉस 15’मध्ये धुमाकूळ घालणारा अभिजीत बिचुकले अखेर घरातून बाद झाला. ग्रॅण्ड फिनालेला काही दिवस उरले असताना बिग बॉसच्या घरातलं शेवटचं एलिमिनेशन झालं. यादरम्यान देवोलिना भट्टाचार्जी आणि अभिजीत बिचुकले हे दोघं बिग बॉसमधून आऊट झालेत.
बिग बॉसच्या घरातून आऊट झाल्यावर देवोलिनाने फार काही मोठी प्रतिक्रिया दिली नाही. पण बिचुकलेच्या संतापाचा मात्र ‘स्फोट’ झाला. ‘बिग बॉस 15’चा होस्ट सलमान खानवर त्याने जबरदस्त आगपाखड केली. सलमान स्वत: काय समजतो. मी काय आहे ते त्याला दाखवून देईल, असं बिचुकले म्हणाला.
बिचुकले सलमानबद्दल नको ते बोलून गेला. सलमानने ‘बिग बॉस 15’च्या घरात मला सतत डॉमिनेट करण्याचा प्रयत्न केला. तो नॅशनल टीव्हीवर माझ्यावर संतापला. आपल्यामुळेच शो चालतो, हा सलमानचा गैरसमज आहे. ‘बिग बॉस 15’चालला तो माझ्यामुळे. सलमानने भलेही 14 सीझन केले असतील. पण 15 व्या सीझनमध्ये तो कमी पडला. त्याच्यासारखे 100 सलमान मी गल्ली झाडायला उभे करील,अशा शब्दांत बिचुकलेनं त्याचा संताप व्यक्त केला.
मी शोमधून बाद झालो, त्याचं काहीही दु:ख नाही. मला थांबण्याची विनंती केली होती, म्हणून मी थांबलो. त्यांना गरज होती म्हणून मी शोमध्ये गेलो. मला अशा शोची गरज नाही. एकदा ग्रण्ड फिनाले होऊ देत, तो झाला की पत्रकार परिषद घेऊन खुलासा करेल. बिग बॉसच्या घरात नेमकं काय चालतं, हे लोकांना सांगेल, असंही बिचुकले म्हणाला.
सलमान अजून अंड्यात आहे. तो अजून अंड्यातून बाहेर यायचा आहे. चाहत्यांनी दिलेल्या प्रेमाच्या भरवशावर तो उड्या मारतो. त्यानं माझ्यासाठी जी भाषा वापरली ना ती भाषा माझ्यासोबत महाराष्ट्रात कोणीही वापरली नाही. वाघ पिंजऱ्यात होता म्हणून तो चाबूक फिरवत होता. पण आता वाघ बाहेर आला आहे, असंही बिचुकले म्हणाला.
वीकेंड वारमध्ये सलमान बिचुकलेवर अनेकदा संतापला होता. ‘बिचुकले, तुम्ही घरात ज्या घाणेरड्या शिव्या देतात. जर त्याच शिव्या तुमच्या कुटुंबातील कोणत्या व्यक्तीला दिल्या तर कसं वाटेल? शेवटचं सांगतोय, जर पुन्हा असं झालं तर घरात येऊन तुला मारेन. इतकंच नाही तुझ्या केसांना पकडून घरातून फरफटत तुला बाहेर काढेन लक्षात ठेव,’ असं सलमान एका एपिसोडमध्ये म्हणाला होता.