भुसावळ : शून्य भंगार मोहिम अंतर्गत मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने एप्रिल2022 ते जून 2023 दरम्यान, 25 मेल/एक्स्प्रेस गाडीच्या कालबाह्य झालेल्या बोगींची भंगारात विक्री केल्यानंतर या माध्यमातून रेल्वेला दोन कोटी 76 लाखांची कमाई झाली. प्रति कोचमागे सरासरी 11.04 लाख इतकी रेल्वेला कमाई झाल्याचे सूत्रांनी सांगितले. गतवर्षी 2022-23 मध्ये 17 डब्यांची भंगारात विक्री केल्यानंतर रेल्वेला 1.81 कोटींचे उत्पन्न लाभले होते. गेल्या तीन महिन्यांत म्हणजे एप्रिल 2023 ते जून 2023 दरम्यान आठ डब्यांच्या भंगार विक्रीतून 94.8 लाखांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.
रेल्वे गाड्यांना जोडणार्या रेल्वे बोगींचे साधारण आयुष्य हे 25 वर्ष निर्धारीत करण्यात आले आहे. प्रत्येक गाडीला जोडण्यात येणारी बोगी (डबे) जोडण्यापूर्वी त्याची तपशीलवार तपासणी केली जाते शिवाय जे डबे चालवण्यास सुरक्षित आहेत त्यांनाच रेल्वे गाड्यांना जोडण्याची परवानगी दिली जाते.