जळगाव ;- आपल्या मातृभूमीसाठी प्राणांची बाजी लावणाच्या वीरांप्रती असलेली अत्यंत आदराची व अभिमानाची भावना व्यक्त करण्यासाठी भारत सरकार दवारा ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’ हे अभियान सुरू करण्यात आले आहे. हे अभियान देशव्यापी आणि लोकाभिमुख आहे. “माझी माती माझा देश’ या उपक्रमामुळे भावी पिढीमध्ये देशभक्तीची ज्योत प्रज्वलित होण्यास मदत होईल. या माध्यमातून देशभक्तीचा ध्येयवाद रुजविला जाईल. असे मत कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक प्रा. डॉ. सचिन वांद्रे यांनी दिला.
शहरातील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविध्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे ‘मेरी माटी, मेरा देश’ या अभियानांतर्गत ‘वीरों का वंदन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या उपक्रमाला रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अकॅडमीक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, एमसीए विभागप्रमुख प्रा. रफिक शेख हे प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी उपक्रमाची प्रस्तावना मांडताना नमूद केले कि, आपल्या देशाचा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक विकास घडविण्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाची महत्त्वाची भूमिका दिसून येते. देशातील युवाशक्तीला नवचेतना देण्याचे कार्य हे देशातील राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाच्या माध्यमातून होत आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
यानंतर डॉ. सचिन वांद्रे यांनी सध्याचे युग हे धावपळीचे आहे. शरीराची काळजी घेण्यासाठीही आपण पुरेसा वेळ देऊ शकत नाही, असे चित्र समोर येते आहे. मात्र, वेळेचे अचूक नियोजन करून योगासनांसाठी वेळ दिला पाहिजे. कारण आरोग्य हीच आपली मोठी संपत्ती आहे असे नमूद करत त्यांनी मतदार नोंदणी, गो-ग्रीन, उज्वल योजना, प्लास्टिक बॅन अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले. सदर उपक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे मुख्य समन्वयक प्रा.अमोल जोशी यांनी समन्वय साधले तर प्रा. योगिता पाटील यांनी आभार मानले