उत्तर प्रदेश, लोकशाही न्यूज नेटवर्क
निपुत्रिक महिलांना पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद देण्यासाठी चर्चेत आलेले बाबा परमानंद यांचे उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 2016 मध्ये या बाबांचा अश्लील व्हिडिओ समोर आला होता. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली होती. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वीच बाबा परमानंद यांना जामीन मंजूर झाला होता. बाबा परमानंद यांना लखनौच्या लारी हॉस्पिटलमध्ये दाखल केले, तेथेच त्यांचा मृत्यू झाला. देशभरातूनच नव्हे तर नेपाळ आणि भूतानमधूनही महिला दररोज मोठ्या संख्येने या बाबांच्या आश्रमात येत होत्या. बाबांचे आशीर्वाद घेण्यासाठी मोठमोठे नेते आणि उच्चपदस्थ अधिकारी यांचा मेळावा लागलेला असायचा.
बाबा परमानंद कोण होते ?
बाबा परमानंद यांचे मूळ नाव रामशंकर होते. सुमारे 30 वर्षांपूर्वी त्यांनी त्यांच्या घरातील एका खोलीत मूर्तीची स्थापना केली, त्यानंतर त्याच खोलीत ढोलक आणि हार्मोनियमसह तंत्र-मंत्र सुरू केले. सुरुवातीच्या काळात त्यांनी झाड-फूंक करत, तंत्रमंत्र करण्यासोबत संगीत थेरपीने प्रत्येक आजार बरा करण्याचा दावा केल्यानंतर त्यांच्या आश्रमात हळूहळू लोकांची गर्दी वाढू लागली. काही वर्षांनी आश्रम हर्रई धाम म्हणून ओळखला जाऊ लागला. काही वर्षांतच रामशंकर स्वामी परमानंद ऊर्फ शक्तीबाबा ऊर्फ कल्याणी गुरू म्हणून प्रसिद्ध झाले. भगवे वस्त्र आणि पांढरी दाढी, गळ्यात जाडजूड हार आणि हाताच्या बोटात अंगठ्या असलेल्या परमानंद यांच्या भक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली.
पुत्ररत्न प्राप्तीचा आशिर्वाद
या बाबांनी निपुत्रिकांना आशीर्वादाने पुत्रप्राप्तीची हमी देत. बाबांच्या एजंटांनी अनेक नवीन भक्तांना आश्रमात आणण्यास सुरुवात केली. बाबा परमानंद यांनी निपुत्रिक स्त्रियांना नरकात जाण्याची आणि मोक्ष न मिळण्याची भीतीही दाखवली होती. त्यासाठी आश्रमात अनेक फलक लावण्यात आले. शनिवार ते मंगळवार असा दरबार लागायचा, ज्यामध्ये अनेक महिलांनी बाबांच्या आशीर्वादानंतर मूल झाल्याचे सांगितले. परमानंद यांनी वेगवेगळ्या कारणांखाली मोठ्या प्रमाणात पैसेही उकळले. हळूहळू भक्तांबरोबरच पोलीस, प्रशासन आणि राजकारणीही परमानंद बाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी दरबारात पोहोचू लागले. मात्र 2016 मध्ये म्युझिक थेरपीच्या नावाखाली आश्रमात निपुत्रिक महिलांचे लैंगिक शोषण झाल्याचे प्रकरण समोर आले होते. हे गुपित उघड झाल्यानंतर कथित बाबा फरार झाले. नंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. बराच काळ तुरुंगात राहिल्यानंतर बाबांना जामीन मिळाला. तत्कालीन एसपींनी त्या बाबांवर अनेक गुन्हे दाखल केले होते.