जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
दुचाकीला सुसाट ऑईल टँकरने जोरदार धडक दिल्याने दोन चटई कामगारांचा जागीच मृत्यू नशिराबाद गावाजवळील राष्ट्रीय महामार्गावर झाला. संदिप मानसिंग शिरसाम (२८), वसंत मुन्ना वरखेडे (२८, दोन्ही रा. धामण्या, जि. बैतूल, मध्यप्रदेश) असे मृत कामगारांची नावे आहेत.
मध्यप्रदेशातील आदिवासी तरुण संदीप मानसिंग शिरसाम (24) आणि वसंत मुन्ना वरखेडे असे दोघेही एमआयडीतील चटई कंपनीत कामाला होते. रविवारी दोन वाजता ते दुचाकी (एम.पी.48.एम.आर.5397) ने गावी जाण्यासाठी निघाले असताना जळगाव तालुक्यातील नशिराबादजवळ भुसावळकडून जळगावच्या दिशेने येणार्या ऑईलच्या टँकर (एम.एच.04 डी.एस.2217) या ने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील संदीप व बसंत या दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती कळताच नशिराबाद पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे यांच्यासह सहाय्यक फौजदार अलियार खान, अतुल महाजन, रुपेश साळवे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले. महामार्गावरील मयत तरुणाचे मृतदेह तातडीने खाजगी गाडीतून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताला कारणीभूत असलेला टँकर व चालकाला नशिराबाद पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
रविवारी अर्ध्या दिवसाची सुटी घेऊन दोघेही गावी निघाले होते. गावी जाऊन पुन्हा दुसऱ्या दिवशी ते रात्रपाळीत कंपनीत कामाला येणार होते. मात्र, गावी घरी पोहचण्यापूर्वीच दोघांना मृत्यूने गाठले.मयत संदीप शिरसाम याच्या पश्चात आई, वडील पत्नी, दोन वर्षाचा मुलगा, तीन वर्षाची मुलगी, दोन भाऊ, दोन विवाहित बहीणी, तर वसंत याच्या पश्चात आई-वडील, पत्नी दोन वर्षाची मुलगी, दोन भाऊ, एक विवाहित बहिण असा परिवार आहे.