अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क
अमळनेर येथे होणाऱ्या ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राज्य शासनातर्फे सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. संमेलनाचे समन्वयक प्रा.डॉ.नरेंद्र पाठक व साहित्य महामंडळाच्या कार्यवाह प्रा.डॉ.उज्ज्वला मेहेंदळे यांनी फडणवीस यांना भेटून साहित्य संमेलनाचे निमंत्रण दिले. यावेळी फडणवीस यांनी संमेलनाच्या तयारीची सविस्तर माहिती घेत कामाबद्दल समाधान व्यक्त केले. संमेलनासाठी उपस्थित राहण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले.
अ.भा.मराठी साहित्य संमेलन तब्बल ७२ वर्षांनतर अमळनेर येथे होत आहे. यामुळे संमेलनाची जय्यत तयारी सुरु आहे. संमेलनाचा उत्साह केवळ अमळनेरच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात दिसून येत असल्याचे डॉ. पाठक यांनी ना.फडणवीस यांना सांगितले. जळगाव जिल्हा व एकंदरीत संपूर्ण खान्देशला साहित्य क्षेत्राची मोठी परंपरा राहिली आहे. यामुळे हे संमलन निश्चितपणे यशस्वी होईलच, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. यावेळी साहित्य संमेलन व महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रावर सविस्तर चर्चा झाली.