संपूर्ण कुटुंबच संपलं, कंटेनरच्या धडकेत भीषण अपघात

६ महिन्यांची चिमुरडीही..

0

अहमदनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

अहमदनगर-संभाजीनगर महामार्गावर मन होरपळून जाणारी घटना घडली आहे. भरधाव वेगात जाणाऱ्या कंटेनरने दोन दुचाकींना पाठीमागून धडक दिली. या भीषण धडकेत दुचाकीवरील एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांचा समावेश आहे. ही घटना पांढरी पूल परिसरात रविवारी (२८ जानेवारी) सायंकाळच्या सुमारास घडली.

या भीषण अपघातात अनिल बाळासाहेब पवार (वय २८), सोनाली अनिल पवार (वय २२), माऊली अनिल पवार (वय ११) तसेच सहा महिन्यांच्या चिमुकलीचा देखील मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या दुचाकीवरील भगवान आव्हाड हे जखमी झाले आहेत.

दरम्यान अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. नागरिकांचा रोष पाहताच कंटेनर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी  दिलेल्या माहितीनुसार, मृत पवार कुटुंबीय वडगाव सावताळ (ता. पारनेर, जि. अहमदनगर) येथील रहिवासी होते. रविवारी कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर एकाच स्कूटीवरून ते घरी परतत होते. सायंकाळच्या सुमारास पांढरी पूल परिसरात पवार कुटुंब आले असता, पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या कंटेनरने त्यांच्या स्कूटीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की यामध्ये पवार कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. सदर अपघाताची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.