मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याचा रश्मी ठाकरे यांचा हट्ट होता, मात्र शरद पवारांच्या नकारामुळे ते शक्य झाले नाही. त्यामुळे संजय राऊत आणि अनिल देसाई यांनी मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाचा आग्रह पवारांकडे धरला, असा दावा अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी केला.
अजित पवार, सुनील तटकरे यांचा एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाला विरोध होता, हा संजय राऊत यांचा दावा पूर्णपणे खोटा आहे. मुख्यमंत्रिपदासाठी अजित पवार हे 2004 साली सक्षम नव्हते, हे केवळ सांगण्याचे कारण आहे. खरे तर पक्षाचे नेतृत्व सुप्रिया सुळे यांच्याकडे देण्याचे स्वप्न तेव्हापासूनच होते. त्यात अडथळा नसावा किंवा समांतर नेतृत्व तयार होऊ नये, यासाठी शरद पवारांनी त्यावेळी मुख्यमंत्रिपद घेणे टाळले आहे, असा दावाही उमेश पाटील यांनी केला.
भारतीय जनता पक्षासोबत जाऊन सत्ता स्थापन करण्याचे 2019 मध्ये ठरले होते. राष्ट्रवादीचे सर्व आमदार आणि नेत्यांची याला संमती होती. शरद पवारांच्या सूचनेनुसार सर्व बोलणी सुरु होती. मात्र, त्यांनी ऐन वेळी भाजपसोबत जाण्याचा निर्णय बदलला, असा आरोप पाटील यांनी केला. 2019 मध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचे ठरले. एकनाथ शिंदेंचे नाव फायनल झाले होते, पण रश्मी ठाकरेंच्या मनात आदित्य यांना सीएम करायचे होते. मात्र शरद पवारांचा नकार होता. त्यानंतर अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद वाटून घ्यायचे ठरले. सुप्रिया सुळेंचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे होते, असंही उमेश पाटील म्हणाले.