‘होय आमचं सरकार ‘तीन चाकी, गोरगरिबांना तीन चाकी रिक्षाच परवडते

0

 उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर सणसणीत टोला

नागपूर : “आमच्या सरकारने असं ठरवलंय की कमी बोलायचं आणि जास्त काम करायचं ,आमचं सरकार गरिबांचं’ असा सणसणीत टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना हाणला. नागपूर हिवाळी अधिवेशाचा आज चौथा दिवस आहे. दरम्यान राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना उद्धव ठाकरे विधानसभेत बोलत होते. दरम्यान, यावेळी अभिभाषणावरील चर्चेवर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीच्या सरकारवर जोरदार टीका केली होती.

शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीचं सरकार ‘तीन चाकी’ आहे. ती धावून धावून किती धावणार, असा चिमटा फडणवीस यांनी काढला होता. त्यालाही मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले. ‘होय आमचं सरकार ‘तीन चाकी’ आहे. कारण, गोरगरिबांना तीन चाकी रिक्षाच परवडते. बुलेट ट्रेन परवडत नाही, असं ते म्हणाले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना मुनगंटीवार यांनी ‘उद्धवा अजब तुझे सरकार’ असा टोला मुख्यमंत्र्यांना हाणला होता. मुनगंटीवार यांच्या या टीकेला त्यांनी कवितेतून प्रत्युत्तर दिले. ‘मुनगंटीवार सुधीर, नका होऊ इतके अधीर… झालात तुम्ही बेकार, म्हणून अजब वाटते आमचे सरकार…’ असा टोला मुख्यमंत्र्यांनी हाणला. शेतकऱ्यांचा कळवळा तुम्ही आम्हाला शिकवू नका. शेतकऱ्यांना दिलेलं वचन आम्ही पाळणारच आहोत,’ असंही मुख्यमंत्र्यांनी सुनावलं.

Leave A Reply

Your email address will not be published.