लोकशाही न्यूज नेटवर्क
ठाणे : सावधान.. लहान मुलांनाही होतोय कोरोना .गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढलीय. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये अंबरनाथमध्ये दीड महिन्यात 107 मुलांना लागण झालीय. तर, बदलापुरात 80 मुलं कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहेत. मात्र, मुलांना रुग्णालयात दाखल करण्याचं प्रमाण कमी आहे.
औरंगाबादमध्येही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये कोरोनाचा धोका वाढलाय. 0 ते 5 वयोगटातील 18 मुलं गेल्या 10 दिवसांमध्ये बाधित झाली आहेत. तर, 6 ते 18 वयोगटातील तब्बल 148 मुलं कोरोनाच्या विळख्यात सापडली आहेत. या सगळ्यापासून लहान मुलांना वाचवायचं असेल, तर पालकांनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचं मत डॉक्टरांनी व्यक्त केलंय.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांनाही कोरोनाची लागण होत असल्याचं समोर आलंय. त्यामुळं पालकांनी आपल्या मुलांची जास्त काळजी घेण्याची गरज आहे. कोरोनाची तिसरी लाट ही सौम्य असल्याचं सांगितलं जातं असलं, तरी ज्यांचं लसीकरण झालंय त्यांनाच कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवतायत. ज्यांनी लस घेतलेली नाही, अशांसाठी हा कोरोना घातक ठरताना दिसतोय. त्यातच या नव्या कोरोनानं लहान मुलांभोवतीही विळखा घातल्याचं समोर आलंय.
अंबरनाथ आणि बदलापूर शहरातली 1 डिसेंबरपासूनची आकडेवारी पाहिली, तर पालकांच्या चिंतेत नक्कीच भर पडेल. अंबरनाथ शहरात 1 डिसेंबर ते 13 जानेवारी या कालावधीत शून्य ते 15 वयोगटातल्या 107 लहान मुलांना कोरोनाची लागण झालीये. त्यापैकी 8 मुलांना ऍडमिट करावं लागलं, तर 99 मुलं घरच्या घरीच बरी झाली.
बदलापूर शहरात 1 डिसेंबर ते 12 जानेवारी या कालावधीत शून्य ते 15 वयोगटातल्या 80 लहान मुलांना कोरोनाची लागण झाली. यापैकी 9 मुलांना ऍडमिट करावं लागलं, तर 71 मुलं घरच्या घरीच बरी झाली. उल्हासनगर शहरात मात्र हे प्रमाण काहीसं कमी आहे. कारण उल्हासनगर शहरात 1 डिसेंबरपासून आजपर्यंत शून्य ते 15 वयोगटातल्या फक्त 14 मुलांना कोरोनाची लागण झालीये. या सगळ्यापासून लहान मुलांना वाचवायचं असेल, तर पालकांनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचं मत अंबरनाथ येथील वैद्यकीय चिकित्सक डॉ. नागेश टोणपे यांनी व्यक्त केलंय.
सध्या दिवसागणिक कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढत चाललीये. शेकडोंच्या संख्येनं दररोज प्रत्येक शहरात कोरोना रुग्ण आढळतायत. मोठ्यांच्या तुलनेत लहानांना कोरोना होण्याचं प्रमाण तसं कमी असलं, तरी ते दुर्लक्ष करण्याजोगं मात्र नक्कीच नाहीये. त्यामुळं पालकांनी आपल्या लहान मुलांची जरा जास्त काळजी घेण्याची आवश्यकता आहे, असं डॉ. नागेश टोणपे म्हणाले.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये कोरोनाचा धोका वाढलाय. लहान मुलांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याचं आकडेवारी मधून समोर आलं आहे. 0 ते 5 वयोगटातील 18 मुले 10 दिवसांमध्ये बाधित झाले आहेत. 6 ते 18 वयोगटातील तब्बल 148 मुलं कोरोनाच्या विळख्यात सापडली आहेत.