साकळी ता.यावल (वार्ताहर) : साकळी सह परिसरात दि. १२ रोजी सकाळपासून ढगाळ वातावरण तयार झालेले होते. त्यानंतर सकाळपासून अचानक अवकाळी पावसाला सुरुवात झाली. दुपारी तर पावसाने एक – दोन वेळा जोरदार हजेरी लावली होती.तसेच दिवसभर पावसाची सारखी रिपरिपच सुरू होती. अवकाळी आलेल्या पावसामुळे परिसरातील वातावरणात मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण झालेला असून या पावसामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे.
गेल्या तीन-चार दिवसांपासून परिसरात आभ्रच्छादीत वातावरण निर्माण झालेले होते. त्यामुळे या दिवसांमध्ये सूर्यदर्शन झालेले नव्हते व थंडीचे प्रमाणही कमी झालेले होते. मात्र रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे सर्व गावसहपरिसर ओला चिंब झालेला आहे पावसाचे पाणी रस्त्यावरून अक्षरश: वाहून निघाले हते. हवामानाच्या अंदाजानुसार अजून पुढे काही दिवस पावसाळी वातावरण असून गारपीटीची शक्यताही व्यक्त केल्याने शेतकऱ्यांसह सर्व नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान आज झालेल्या पावसामुळे वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झालेला आहे व यानंतर काळात थंडीचा जोर वाढू शकतो . तेव्हा या थंडीमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यासंबंधी समस्या वाढणार आहे. अवकाळी परिसरातील पावसामुळे छोट्या अवस्थेतील गहू , हरभरा ,मका यासह रब्बी पिकांना मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची संभावना आहे. एकूणच पावसाळी वातावरण निर्माण झाल्यामुळे सर्वांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.