यावल (प्रतिनीधी ) एकीकडे जगभरात कोरोना या भयंकर आजाराने थैमान घातले असताना दुसरीकडे कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याने कोरोना पासून नागरिकांचा बऱ्याचअंशी बचाव होत असल्याचे आरोग्य यंत्रणेकडून सांगितले जात आहे. त्यामुळे लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये गैरसमज दुर होऊन मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे त्यामुळेच आता सर्वत्र लसीकरणाला वेग आलेल्या असताना साकळी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या सर्वच गावांमध्ये सुद्धा लसीकरणाला आता चांगलाच वेग येऊ लागला आहे. जसजशा प्रमाणात लस उपलब्ध होईल तसा लसीकरणाचा अजून वेग वाढेल त्यामुळेच कोरोना महामारीला निश्चितच आळा बसेल व आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होईल. असे आशादायी चित्र निर्माण होण्यास सुरुवात झालेली आहे.
दरम्यानच्या काळात साकळी परिसरात लसीकरणाचा वेग वाढत असल्याने निश्चितच हे आरोग्य यंत्रणेची सुद्धा यश आहे. याबाबत साकळी ता यावल येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर पाटील यांच्याशी चर्चा केली असताना त्यांनी लसीकरण संदर्भात महत्वाची माहिती दिली.
साकळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत जळगाव जि.प.आरोग्य व शिक्षण सभापती रवींद्र(छोटूभाऊ)पाटील,यावल पं.स.मा.सभापती दिपक आण्णा पाटील,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत बऱ्हाटे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ.सागर पाटील हे स्वतः तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वाती कवडीवाले हे आपल्या नियोजनाखाली स्थानिक आरोग्य यंत्रणेच्या मदतीने लसीकरण मोहीम राबवीत आहे.यात गेल्या जवळपास एक महिन्यापासून लसीकरण मोहीम राबवली जात असून या मोहिमेदरम्या आतापर्यंत ४५ वर्षाच्या वरती असलेल्या जवळपास अठराशे लाभार्थी नागरिकांना ‘ कोविशिल्ड ‘ या लसीने लसीकरण झालेले आहे. यात वयोवृद्ध माहिला-पुरुष, दिव्यांग,व इतर आजारांचे रुग्ण यांनाही लसीकरण केलेली आहे तसेच १८ ते ४५ वयोगटातील फ्रंट वर्कर म्हणून स्थानिक आरोग्य यंत्रणा, ग्रामपंचायत, महसूल, शिक्षण,बँक यासह सर्व आस्थापनामधील कार्यरत असलेल्या कर्मचारी वर्गाला प्राधान्याने लसीकरण करण्यात आलेले आहे. त्याप्रमाणे गाव परिसरातील सर्व स्थानिक पत्रकारांना सुद्धा ‘ फ्रंटवर्कर ‘ म्हणून लसीकरण करण्यात आलेले आहे. लसीकरणानंतर लाभार्थ्यांना आरोग्य यंत्रणेच्या देखरेखीखाली ठेवण्याकरता केंद्रातप्रतिक्षा कक्षाची तयार केलेले आहे.या कक्षात बसण्याची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच लस घेतलेल्या लाभार्थ्यास काही त्रास झाल्यास औषध उपचाराची सुद्धा सुसज्ज अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याच प्रमाणे लसीकरणा अगोदर नागरिकांना बसण्यासाठी केंद्राच्या बाहेर मंडप टाकून बसण्याची व्यवस्था निर्माण करण्याचे नियोजन आहे.
आरोग्य यंत्रणेच्या वरिष्ठ पातळीवरून लस प्राप्त झाल्यानंतर १८ ते ४५ वयोगटातील लाभार्थ्यांना ‘
कोव्हॅक्सिन ‘ या लसीचे स्थानिक नियोजनानुसार दोन सत्रामध्ये लसीकरण केले जाणार आहे.त्यावेळी लसीकरणासाठी तरुण वर्गाचा समावेश होणार असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होणार आहे. त्यासाठी केंद्रस्तरावर योग्य असे नियोजन केले जाणार आहे.त्यासाठी गाव परिसरातील सर्व नागरिकांची सहकार्य मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
साकळी केंद्राअंतर्गत जवळपास ३० ते ३५ गाव येतात. त्यात सहा सबसेंटर सुद्धा येतात त्यापैकी थोरगव्हण व टाकरखेडा येथे एक वेळा तर बोरावल,वढोदा येथे दोन- दोन वेळा लसीकरण टप्पा झालेला आहे. जसजशी लस उपलब्ध होईल तसतसे सर्व सब सेंटरच्या गावांमध्ये लसीकरण केले जाणार आहे. या लसीकरण मोहिमेकरता दोघं वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियोजनाखाली आरोग्य सेवक- सेविका,एन.पी. डब्ल्यू ,आशावर्कर,अंगणवाडी कर्मचारी,आरोग्य कर्मचारी तसेच गावपरिरातील स्थानिक पदाधिकारी आरोग्यदूत,सामाजिक कार्यकर्ते या सर्वांचे आवर्जुन सहकार्य मिळत आहे. अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.सागर पाटील यांनी दिली.
सध्या कोरोनामुळे सर्वांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असून आरोग्य यंत्रणेवरील ताण निश्चित वाढलेला आहे. कोरोना पासून बचाव करण्यासाठी सर्वांनी तोंडाला मास लावणे , वारंवार हात स्वच्छ करणे तसेच सोशल डिस्टन ठेवणे हे नियम पाळणे नितांत गरजेचे असून त्यासोबत लस घेणे हे ही तितकेच महत्वाचे आहे.लशीचे परिणाम चांगले असून लसीच्या मात्रामुळे कोरोना पासून निश्चित बचाव होऊ शकतो. तरी केंद्राअंतर्गत च्या सर्व गावातील नागरिकांनी नियोजनानुसार व लशीच्या उपलब्धतेनुसार लसीकरण करून घ्यावे. असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर पाटील व स्वाती कवडीवाले यांनी सांगितले.