मुंबई : विधानसभा निवडणूक निकालानंतर १३ दिवस उलटून गेल्यानंतरही राज्यात निर्माण झालेला सत्ता स्थापनेचा गोंधळ निर्माण झाला आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये निर्माण झालेला दुरावा जराही कमी झालेला नाही, तसेच तो दूर होतानाही दिसत नाही. मात्र सत्तास्थापनेचा फॉर्म्युला अखेर ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्रीपद भाजपाकडे आणि १६ मंत्रिपदं शिवसेनेकडे असा सत्तेचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
सत्तेचा हा फॉर्म्युला थेट समोरासमोर ठरलेला नसला तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मध्यस्थांमार्फत एकमेकांच्या संपर्कात असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याद्वारेच हा फॉर्म्युला ठरल्याचंही समजतं आहे. भाजपाने याआधी शिवसेनेला १३ मंत्रिपदं ऑफर केली होती. मात्र मुख्यमंत्रीपदाचा आग्रह सोडायचा असेल तर निम्मी मंत्रिपदं द्या अशी ठाम भूमिका शिवसेनेने घेतली आहे. त्यामुळे सत्तास्थापनेचा पेच सुटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.