पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क
नांद्रा ता. पाचोरा व परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सततधार पाऊस चालूच आहे. काल दि. २२ सप्टेंबर पासून मध्य राञी पासून पावसाचा जोर खूपच वाढला व याच संततधार पाऊसामुळे बोरसे गल्लीतील भास्कर ञ्यबंक बाविस्कर यांच्या मालकीचे असलेले मातीचे घर पावसाचे पाणी मुरून कोसळले.
सुदैवाने त्यात कोणी राहत नव्हते म्हणून जिवीतहानी टळली आहे. परंतु घरामधील जीवनाश्यक वस्तू, भांडे, पाण्याची टाकी, अन्न धान्य, शेतीचे अवजारे व इतर संसारोपयोगी वस्तू दबल्याने मोठे प्रमाणात नूकसान झाले असून पडलेल्या घराचा पंचनामा होऊन उचित भरपाई मिळण्याची मागणी गुलाब भास्कर बाविस्कर यांनी केली आहे.
गेल्या दोन दिवासांपासून नांद्रा परिसरात अतिवृष्टी होत असून माणसाबरोबरच गुरे ढोर यांची ही संततधार पावसामुळे यातायात होत आहे. गुराढोरांवर ही साथीचे आजार येत आहे. शेतीचे येणारे उत्पन्न ही आता हिरावले गेले आहे. कापूस पिवळा पडत आहे, कैऱ्या सडत आहेत, सोयाबीन आडवा पडून शेंगा सडत आहेत, मक्का, ज्वारी व इतर पिके नेस्तनाबूत होऊन सडत आहेत. शासनाच्या निकषाप्रमाणे ६० एम. एम. च्या वर पावसाची नोंद झाली तर अतिवृष्टी ग्राह्य धरली जाते. तरी पर्जन्यमान मापनयंञाचे अहवाल घेऊन सरसकट ओला दृष्काळ जाहीर करावा अशी मागणी नांद्रासह परिसरातील शेतकरी वर्गातून व पशुपालक व ग्रामस्थ यांच्यातून होत आहे.