चाळीसगाव (प्रतिनिधी ) शिवनेरी फाऊंडेशन संचलित भुजल अभियानांतर्गत मिशन पाचशे कोटी लिटर जलसाठा निर्माण स्पर्धा 2020. ला चाळीसगाव तालुक्यामध्ये जोरदार सुरुवात झाली.*
चाळीसगाव तालुक्यातील कळमडु ,अभोणे तांडा येथे अभियानाचा एक भाग म्हणून स्पर्धेत सहभागी संपूर्ण गावांमधील लोकांना, जलसंधारणाचे शास्त्र व शिस्त समजवण्यासाठी प्रशिक्षण केंद्राची सुरुवात झाली. सकाळी ८.३० वाजेला तालुक्याचे आमदार श्री मंगेशदादा चव्हाण व त्यांच्या पत्नी सौ प्रतिभाताई मंगेश चव्हाण यांनी, प्रशिक्षणाला जाणाऱ्या टीमला चाळीसगाव येथुन शुभेच्छा देऊन रवाना केले. आणि टीम कळमडु ला दहा वाजेला पोहोचली. कळमडू गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विद्यामंदिराच्या, शिक्षकांनी तालबद्ध विद्यार्थ्यांकडून बसवलेल्या, लेझीम पथकाने या प्रशिक्षणार्थी टीमचे जोरदार स्वागत करण्यात आले.
तसेच कळमडू , आभोणे (तांडा) राजमाने, कुंझर, चिंचगव्हाण सुंदर नगर, तांडा, वरखेडे इत्यादी गावांमधील बहुसंख्य नागरिक तसेच पदाधिकारी उपस्थित होते. त्याचबरोबर आपल्या तालुक्याचे प्रांत अधिकारी लक्ष्मीकांत सातारकर, तालुक्याचे तहसीलदार अमोल मोरे, गट विकास अधिकारी अतुल पाटील, तालुका कृषी अधिकारी साठे, मेहुणबारे पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे साहेब, एम एस ई बी चे कार्यकारी अभियंता संदिप शेंडगे यांच्यासह इतर अधिकारी सुद्धा हजर होते. आपल्या मनोगतामध्ये प्रांताधिकारी साहेबांनी आलेल्या प्रशिक्षणार्थी गावकऱ्यांना पुढील कामासाठी शुभेच्छा तर दिल्याच, परंतु शासकीय स्तरावरून सर्वतोपरी मदत उपलब्ध करून देण्यासंदर्भात आश्वस्त ही केले. त्याचबरोबर तहसीलदार, गट विकास अधिकारी, आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांनी सुद्धा गावकऱ्यांना सर्वतोपरी शासकीय मदत घेऊन आपले गाव पाणीदार करण्यासंदर्भात माहितीसह, आश्वासन दिले.
तसेच आपल्या तालुक्याचे लाडके आमदार, आणि प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटक श्री मंगेश दादा चव्हाण यांनी आपल्या तालुक्याने कोणत्या स्वरूपाने काम करावे, आणि गावात काम करताना लागणारी मदत, कशा स्वरूपात मिळणार त्या संदर्भात माहिती दिलीच, त्याचबरोबर स्पर्धेत प्रथम येणाऱ्या गावाला आमदार एक लाख 51 हजार रुपये बक्षीस, द्वितीय क्रमांकाच्या गावाला एक लाख रुपयाचे बक्षीस, आणि तिसऱ्या क्रमांक येणारे गावाला 75 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.