सांगली : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला. ‘उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्याशी सरकार चालवण्याचे कॉन्ट्रॅक्ट केले आहे. पवारच सध्या सरकार चालवतात. त्यामुळं एखाद्या प्रश्नासाठी पवारांनाच भेटलं पाहिजे,’ असं पाटील म्हणाले. ते सांगली येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.
‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून काय उपयोग? सध्या शरद पवार हेच राज्य चालवतात. त्यामुळं त्यांनाच भेटलं पाहिजे. शिवाय, मुख्यमंत्र्यांपेक्षा राज्यपाल आणि शरद पवार हेच भेटीसाठी जास्त उपलब्ध असतात,’ अशीही खोचक टीका चंद्रकांत पाटील यांनी आज केली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. दूध उत्पादक शेतकऱ्यांना दरवाढ आणि वाढीव वीज बिलाचा मुद्दा राज ठाकरे यांनी उपस्थित केला. पण याबाबत राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्याशी बोलावे, असा सल्ला राज्यपालांनी दिला आहे. यावरूम शरद पवार हेच राज्य चालवतात, हे स्पष्ट होते. शरद पवार घराबाहेर पडतात, उद्धव ठाकरे यांनी बोलून काही उपयोग नाही, असा सणसणीत टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्य सरकारनं आता एक एक गोष्ट उघडण्यासाठी काम करायला हवं. गर्दी टाळण्यासाठी आरखाडा तयार केला पाहिजे. मंदिरात गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ऑनलाइन प्रवेश द्यावा, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी लगावला.