वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
अनेक वर्षापासुनची बस स्थानकाची मागणी जागे अभावी पुर्ण होत नसल्याने तात्पुरत्या स्वरूपात बस स्थानक चौकात प्रवाशी निवारे उभारण्यात आले असले तरी त्याचा प्रवाशांना तिळमात्र उपयोग नाही. तर तो फळ विक्रत्येसह इतरांना होत असुन निवारे फक्त नावालाच आहे का ? असा सवाल उपस्थित होत असुन चारही निवारे आजतरी अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे.
वरणगाव शहराला एस टी बस फेऱ्याची वर्दळ मोठ्या प्रमाणात असल्याने प्रवाशांच्या संख्याही तेवढ्याच प्रमाणात आहे. मात्र पुर्वीपासुन बस स्थानक नसल्याने थांब्यावरून गाड्याची ताटकाळत उभे राहून वाट पाहावी लागत असल्याने वरणगावला बस स्थानक व्हावे, यासाठी राजकिय स्तरावरही प्रयत्न करण्यात आले होते. स्थानकासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने रेंगाळले. मागील वर्षी बस स्थानकावर तर किमान प्रवाश्यासाठी निवाऱ्याची मागणी शहरवासीयांनी केल्याने बस स्थानक चौकात चार प्रवाशी निवाऱ्याची उभारणी करण्यात आली होती. मात्र प्रवाशाना त्यांचा काहीच फायदा होत नाही, तर त्याचा फायदा फळ विक्रेते, भाजीपाला विक्रेतेच घेतात. आजुबाजुस रिक्षा विळखा घालून उभ्या करण्यात येतात, त्यामुळे प्रवाशाना बस स्थानक चौकात प्रवाशी निवारे आहे किंवा नाही याचा पत्ताच लागत नाही.
रहदारीची कोंडी सुटेना
बस स्थानक चौकतून पुर्वी अवजड वाहनांसह सर्वच वाहनाची वाहतूक होती. मात्र गेल्या काही महिन्यांपासून नवीन राष्ट्रीय महामार्गाचे काम झाल्याने वाहतूकीसाठी खुला झाला असल्याने लांब पल्याचे अवजड व इतर वाहने त्या मार्गाने जात असताना देखील बस स्थानक चौकात पुर्वी पेक्षा अधिक प्रमाणात पायी चालणाऱ्यांना हात गाडी व रिक्षा व इतर वाहनाचा त्रास होत आहे. येथील रहदारी नियंत्रणासाठी पुर्वी दोन शिपायांची नेमणूक होती. अचानक काही दिवसापासुन ते दिसेनासे झाल्याने या चौकात रहदारीची मोठ्या प्रमाणात कोंडी होते आहे.