जिल्हयात लोकसभा निवडणूकीचे वारे
जळगांव.-
देशभरात 17 व्या लोकसभच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी आचारसंहिता जाहिर झाली आहे. नागपुरसह इतर जिल्हयात पहिल्या टप्प्यातील निवडणूकांचे अर्ज भरण्याची तयारी सुरू आहे. तर जळगांव जिल्हयात देखिल तिसर्या टप्प्यात होणार्या निवडणूकीचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निवडणूक आयोगातर्फे 28 मार्च रोजी निवडणूक कार्यक्रम जाहिर होईल. त्यानंतर खर्या अर्थाने माघारीनंतर निवडणूकीच्या प्रचाराला रंगत येईल. रावेर मतदार संघात विद्यमान खा. रक्षा खडसे यांच्या विरोधात अजून उमेदवार कोण हे स्पष्ट झालेले नसले तरी जळगांव मतदान संघात मात्र विद्यमान खा. ए.टी.पाटील यांची हॅट्र्ट्रीक हुकली आहे. त्यांच्या ऐवजी विघानपरीषद सदस्या आ. स्मिता वाघ आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यात येत्या काही दिवसातच सुरू होणार्या आरोप प्रत्यारोपांची जुगलबंदी होणार आणि मराठा कार्ड वापरून बाजी कोण मारणार हे काळच ठरवणार आहे. एकुणच जिल्हयात खरी लढत युती आघाडीत होणार आहे.
माजी आ.गुलाबराव देवकर हे जळगांव ग्रामीण मधुन निवडून गेलेेले असून त्यांनी जळगांव नगरसेवक, नगराध्यक्ष यासह आमदार आणि पालकमंत्री म्हणून जिल्हयाचे कामही पाहीलेले आहे. तर आ. स्मिता वाघ यांनी विद्यार्थीदशेपासून अभाविपच्या माध्यमातुन ते अमळनेर तालुक्यातील जिल्हा परीषदेच्या गटामधुन जि.प. सदस्या. अध्यक्षा व सद्यस्थितीत आमदार म्हणून आहेत. दोघाही प्रतिनिधींना जिल्हयाच्या ग्रामीण भागातील जनतेविषयीच्या प्रश्नांची जाण आहे. विधानपरीषद सदस्या आ. वाघ यांनी पाणी टंचाई असो, विजवितरण, दुष्काळ निवारणार्थ योजना, या विषयी नेहमीच धडाडीने जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन बैठकीत किवा विधानपरीषदेत देखिल अनेक प्रश्नांना वाचा फोडली आहे. तर माजी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कार्यकाळात धरणगांव रेल्वे गेट जवळच उड्डाणपुलाच्या निर्मिती विषयी प्रश्न मार्गी लावला आहे. आता त्यांचे लक्ष केवळ शिवाजीनगर उड्डाण पुलाविषयी आहे, खासदार म्हणून निवडून आल्यास त्यांनी शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचा प्रश्न सोडविण्याचा चंग बांधला आहे. तर विद्यमान आमदार भोळे, महापौर भोळे वा माजी महापौर कोल्हे, लढ्ढा यांचेसह खुद्द देवकर यांनी पालक मंत्री असतांना त्यांना त्यांच्या कार्यकाळात हा प्रश्न सोडविता आलेला नाही. त्यांच्या कार्यकाळातच शिवाजीनगर पुलाची कालमर्यादा संपुष्टात आली होती. रेल्वे प्रशासनाने तसे सुचित केले होते तर या विषयी माजी आमदार, महापौर यांनी वेळोवेळी आयोजीत केलेल्या महासभेत हे प्रश्न निकाली निघाले नाहीत. माजी महापौर, आयुक्त यांनी वेळीच रस्ते उभारणी कामाविषयी निर्णय घेवून पर्यायी मार्गाची दुरदृष्टी अंमलबजावणी केली असती तर आज वाहतुकीची कोंडीसह अनेक प्रश्न निकाली निघाले असते. शहरात प्रवेश करताच अनेक ठिकाणी मुलभुत सुविधांची वानवा, ठिकठिकाणी कचरा भरून ओसंडून वाहणार्या कचराकुंडया, सर्वसामान्य नागरीकांसाठीच नव्हे तर विशेषतः प्रसाधनगृहा अभावी होणारी महिलांची कुचंबणा हे मनपा अधिकारी वर्ग पर्यायाने लोकप्रतिनिधींनी केलेले दुर्लक्ष, आजही जिल्हा परीषद ते टॉवर चौका पर्यंत तसेच अन्य ठिकाणी टयुबलाई वा हायमास्ट लॅम्प ऐवजी बसविण्यात आलेले अनेक एलइडी बंद अवस्थेत आहेत. अनेक गटांरांवरील ढापे नादुरूस्त आहेत. समांतर रस्ते महामार्गासाठी आंदोलन साखळी उपोषण करून सुद्धा कोणतीही उपाययोजना न झाल्यामुळे नशिराबाद ते शहराची हद्द नव्हेतर जिल्हयाची धुळे कडे हद्द संपेपर्यत महामार्गावर होणार्या अपघातात दररोज एक दोन बळी जातच आहेत हे प्रश्न दुर्लक्षितच रहाणार आहेत कि यांना न्याय दिला जाईल हे काळच ठरवेल.
जिल्हयातील पश्मिम भाग हा पुर्वी ऊस आणि केळीचे आगार म्हणून ओळखला जात होता, कासोदा वनकुठे येथील वसंत सहकारी साखर कारखाना, कजगाव येथील केळीचा मालधक्का, नगरदेवळयाची सुतगीरणी हे आजमितीस बंद नव्हे तर अवसायनात गेले असून त्यासंदर्भातील भागधारक वा उस, केळी उत्पादकांचे प्रश्न काळाच्या उदरात गडप झालेत. दरवर्षी हजारो सुशिक्षितांचे लोेंढे आधुनिक हरीश्चंद्राच्या शिक्षण क्षेत्ररूपी फॅक्टरीतुन बाहेर पडत आहेत. त्यांना कोणते रोजगार संधी उपलब्ध होत आहेत, केली जाणार आहे, त्यावर कोणताही लोकप्रतिनिधी चकार शब्द बोलण्यास तयार नाही.
जिल्हा टंचाईमुक्त, टँकरमुक्त व्हावा, अवैध वाळू वाहतुकीचे नेहमीच जाणारे बळी थांबविणे यासाठी ठोस उपाययोजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी ऐवजी गिरणा नदीवर बलुन बंधारे, कोल्हापुरी बंधारे हेच नेहमी वापरले गेलेले, संवेदना हिन बोथट झालेले हत्यार लोकांच्या भावना गोंजारण्यासाठी वापरले जाणार, परंतु प्रत्यक्षात बारमाही प्रवाही असणार्या गिरणा, तापी, अंजनी, बोरी आदी नदी पात्रांचे वस्त्रहरण वा गावातील तसेच औद्योगीक वसाहतीचे पाणी थेट नदी पात्रात सेाडण्यामुळे होणारे प्रदुषण रोखण्यासाठी ठोस प्रयत्न करणार हे मुद्दे मात्र टाळले जाणार आहेत कि कोणत्या उपाययोजना करणार हे देखिल पहाणे तितकेच महत्वाचे ठरणार आहे.