मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर बोलताना उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी युतीवर शिक्कामोर्तब केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या विस्ताराचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना ‘युतीचंच सरकार येणार’ असा विश्वास व्यक्त करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीवर शिक्कामोर्तब केले.
उद्धव ठाकरे म्हणाले, ‘राज्यात युतीचंच सरकार येणार आहे. आम्हाला सत्तेची हाव नाही, मात्र राज्याचा विकास कऱण्यासाठी सत्ता हवी आहे. राज्याला मजबूत सरकार मिळणार आहे.’
मोदींवर स्तुतीसुमने
उद्धव ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात करतानाच पंतप्रधानांवर स्तुतीसुमने उधळली. “मोदीजी मी किती गोष्टींसाठी तुमचं अभिनंदन करु. गेली अनेक वर्ष जे आपण बोलत होतो ते तुम्ही करून दाखवलं आहे. काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक होता, आहे आणि राहणार आणि हे नरेंद्र मोदींनी सिद्ध करुन दाखवलं. आमच्यामधे असलेल्या ताकदीचा सदुपयोग कऱणारा आणि मार्गदर्शन करणारा नेता आम्हाला सापडला आहे. देशाच्या अस्मितेचे विषय मोदीजी सक्षमतेने हाताळत आहेत. मोदींच्या रुपाने देशाला समर्थ नेतृत्त्व मिळालं आहे” अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी मोदींचं कौतुक केलं. ‘आता समान नागरी कायदा आणि राम मंदिराचं स्वप्नही पूर्ण करू’ असा निर्धारही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.