यावल (प्रतिनिधी) । राज्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने अनेक कडक निर्णय घेतले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. असं असतानाही यावल शहरात संचारबंदीत विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी चोप दिला आहे.
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाने भारतासह महाराष्ट्रात हळूहळू पाय पसरविण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, यावल शहरात व तालुक्यात संचारबंदीचे उल्लंघन करून नागरिक शहरात विनाकारण बिनधास्त फिरत असताना दिसून येत आहे. यावलचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी व त्यांच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी शहरात आज सकाळी गस्त घालून जमावबंदीचा आदेशाचे पालन न करणाऱ्या व कुठलेही काम नसताना फिरणाऱ्यांना चांगला चोप दिला. आज सकाळपासूनच पोलीस निरीक्षक अरुण धनवडे हे आपल्या पोलिस कर्मचार्यांसह यांनी शहरातील बुरुज चौक ते बोरावल, गवत बाजार गेट, कोर्ट रोड, सुदर्शन चित्र मंदिर, भुसावळ टी पॉइंट, यावल बस स्थानक परिसर या परिसरात गस्त घालून विनाकारण दुचाकी वाहने घेऊन बाहेर फिरणाऱ्याना चांगला चोप दिला.
दरम्यान, जमाबंदी काळात नागरिकांनी आपल्या सुरक्षेसाठी बाहेर घराबाहेर निघू नये असे आवहान पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी तालुक्यातील नागरिकांना केले आहे.