नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. दुसऱ्या बॅंकेच्या एटीएममधूनही डेबिट कार्डच्या सहाय्याने तीन महिने पैसे काढण्यावर लावला जाणारा सरचार्ज रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही घोषणा केली.
बचत खात्यावर असणारी किमान रकमेची अटही तीन महिन्यासाठी त्यांनी शिथील केली. कोरोनाच्या बाधेमुळे कराव्या लागणाऱ्या उपाय योजनांमुळे नागरिकांना सोसाव्या लागणाऱ्या अडचणी कमी व्हाव्यात, या हेतूने ही पावले टाकण्यात आल्याचे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी जाहीर केले.
लहान कंपन्यांची थकीत बिलांची समस्या लक्षात घेऊन त्यांची नादारीची मुदत सध्या एक लाख आहे, ती एक कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे लहान आणि मध्यम उद्योगांना त्याचा लाभ होईल, असे त्या म्हणाल्या. सध्यासारखीच परिस्थिती जर एप्रिलपर्यंत राहिल्यास नादारी आणि दिवाळखोरी संहितेचे कलम 7, 9 आणि 10 रद्द करण्याचा विचार सरकार करत आहे, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे थकीत कर्ज नादारीत जाऊन त्याचा लाभ कंपन्यांना होईल. पाच कोटी रुपयांपर्यंत उलाढाल असणाऱ्या कंपन्यांनी वस्तू आणि सेवा कराचे फायलिंग उशीरा केल्यास त्यांना दंड होणार नाही.