नवी दिल्ली :- लोकसभा निवडणुकीत भाजपाने दुसऱ्यांदा बहुमत मिळवत पंतप्रधानपदावर विराजमान होणाऱ्या मोदींच्या मंत्रिमंडळात कुणाला संधी मिळणार आणि मावळत्या मंत्रिमंडळातील कुणाचे पत्ते कट होणार, याविषयी आता चर्चेला सुरूवात झालीय. जुन्याच सहकाऱ्यांना पुन्हा संधी देणार की नव्या सहकाऱ्यांवर महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी देणार याविषयी चर्चा सुरू झालीय.
सतराव्या लोकसभेच्या अध्यक्षपदी मावळते गृहमंत्री राजनाथ सिंह यांची निवड केली जाण्याची चर्चा आहे. राजनाथ सिंह यांच्या बरोबरीनेच लोकसभा अध्यक्षपदासाठी मावळते पर्यावरण, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन यांचेही नाव चर्चेत आहे. अर्थात या दोन नावांव्यतिरिक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा अध्यक्षपदासाठी आश्चर्याचा धक्का देणारे नाव पुढे करू शकतात, असे म्हटले जात आहे. मोदी मंत्रिमंडळात यावेळी पन्नास टक्के नवे चेहरे असतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या विजयाचं श्रेय जातं तसंच ते अमित शाह यांनाही जातं. अमित शाह यांना मोदींचा वजीर म्हणून ओळखलं जातं. त्यांच्याकडे भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा आहे. मात्र नव्या मंत्रिमंडळात अमित शहांना गृहमंत्री किंवा अर्थमंत्रीपद दिले जाईल, अशी शक्यता आहे. शहा गृहमंत्री झाल्यास राजनाथ यांना लोकसभा अध्यक्षपदी बसविले जाण्याची शक्यता आहे. मात्र, शहा यांना अर्थमंत्रीपद देण्यात आले, तर लोकसभेचे अध्यक्षपद शांत, तटस्थ स्वभावाच्या, पण भाजपशी बांधिलकी असलेल्या डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे सोपविले जाऊ शकते. अर्थात मोदींच्या मनात आणखी कोणते नाव असेल याचा अंदाज लावता येत नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
मोदींच्या पहिल्या चार मंत्र्यांमध्ये अमित शहा यांचा समावेश निश्चित असून मावळते अर्थमंत्री अरुण जेटली, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे भवितव्य अधांतरी मानले जाते. गृहमंत्री राजनाथ सिंह यांची लोकसभा अध्यक्षपदी निवड होणार असेल, तर मूळच्या चार अव्वल मंत्र्यांपैकी केवळ संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांचेच स्थान निश्चित मानले जाते.स्वराज यांनी लोकसभा निवडणूकच लढली नसल्यामुळे त्यांचे मंत्रिमंडळातील स्थान डळमळीत झाले आहे. पण राज्यसभेवर निवडून आलेले अमित शहा लोकसभेवर निवडून आल्यामुळे त्यांच्या रिक्त होणाऱ्या जागेवर सुषमा स्वराज यांना निवडून आणून परराष्ट्र मंत्रीपदी कायम ठेवणे शक्य आहे. अन्यथा परराष्ट्र मंत्रिपदी निर्मला सीतारामन यांची नियुक्ती करुन संरक्षण मंत्रीपदासाठी सुरेश प्रभू यांच्या नावाचा विचार होऊ शकतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
केंद्रीय भूपृष्ठ, जलवाहतूक आणि जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तीच खाती कायम ठेवली जाण्याची शक्यता असून प्रकाश जावडेकर, धर्मेंद्र प्रधान, जगतप्रकाश नड्डा, रवीशंकर प्रसाद, राज्यवर्धन राठोड आणि मुख्तार अब्बास नकवी यांचीही पूर्वीचीच खाती कायम ठेवली जातील अशी चर्चा आहे. राहुल गांधी यांचा पराभव करणाऱ्या स्मृती इराणी यांना कोणती बढती मिळते याकडेही लक्ष लागलेले आहे. लोकसभेच्या उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेला संधी मिळू शकते किंवा बिजू जनता दलाचे भ्रातृहरी महताब यांच्या नावाला भाजप आणि विरोधी पक्षांचेही समर्थन मिळू शकते.
Absolutely Right….