मुंबई | प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 2019 च्या लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. मनसे आगामी लोकसभा निवडणूक लढणार नाही, असे पत्रक मनसेकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे.
मनसेने गेल्या लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली होती. त्यानंतर यंदा मनसे लोकसभा निवडणूक लढणार की नाही, याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. या सर्वाला अखेर पूर्णविराम मिळाला असून मनसेने लोकसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा आज केली. ‘मनसे यंदाची लोकसभा निवडणूक लढविणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी’ असे प्रसिद्धीपत्रक आज पक्षाचे नेते शिरीष सावंत यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आले आहे. या पत्रात ‘बाकी १९ मार्च २०१९ ला बोलूच’ असेही पुढे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे १९ मार्च रोजी राज ठाकरे यावर अधिक भूमिका स्पष्ट करतील, असे सांगितले जात आहे.