मुंबई : माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी आज भाजपमध्ये अधिकृत पक्ष प्रवेश केला आहे. यावेळी भारतीय जनता पक्षातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन आणि इतर बडे नेते उपस्थित होते. सानप यांच्या प्रवेशानंतर देवेंद्र फडणवीस यांनी भाजपमध्ये आणखी काही नेत्यांचा प्रवेश होणार असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
‘भाजपमध्ये येत्या काळात अनेक जणांचा प्रवेश होणार. काही जण रोज वावड्या उठवतात भाजपचे लोक आमच्याकडे येणार. खरं म्हणजे या वावड्या उठवण्याचे कारण एकमेव आहे. कोणी त्यांच्याकडे जाणार नाहीत हे त्यांनाही माहिती आहे. पण त्यांच्या पक्षात इतकी अस्वस्थता आणि नाराजी आहे. की हे आमदार काय करतील ही भीती असल्यामुळं या वावड्या उठवल्या जात आहेत,’ असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तर, ‘भविष्यात भाजपमध्ये चांगले लोक येणार आहेत. त्यांना आपण सोबत घेऊन योग्य जबाबदारी देणार आहोत,’ असंही त्यांनी म्हटलं आहे.
‘गेल्या काही काळाच विविध पक्षांतून भाजपमध्ये आलेले लोक राजकीय दृष्ट्या अधिक प्रगल्भ आहेत. त्यांनी मोठं राजकारण बघितलं आहे. या देशाचं भविष्य आणि वर्तमान नरेंद्र मोदी हेच आहेत. याची त्यांना कल्पना आहे. त्यामुळं धोक्यानं आलेल्या सरकारचं भविष्य कितीकाळ चालणार याबाबतची माहिती सगळ्यांना आहे,’ असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.