मुंबई : महाविकास आघाडी सरकारचा नुकताच मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. दरम्यान, यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नव्या मंत्रिमंडळाची बैठक घेऊन मंत्र्यांसोबत संवाद साधला. या बैठकीत भाजपपासून सावध राहा अशा सूचना उद्धव ठाकरेंच्या नवीन मंत्र्यांना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
तुम्हाला माहित आहे की हे सरकार अत्यंत सक्षम आहे. आपण संपूर्ण पाच वर्ष पूर्ण करु, असा विश्वास मुख्यमंत्री ठाकरेंनी व्यक्त केल्याची माहिती एका मंत्र्यांच्या माध्यमातून समोर येत आहे. तसेच भाजप तुमची आणि सरकारची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करेल. त्यांच्या जाळ्यात अडकू नका. खूप काम करा आणि भाजपमुळे तुमचं लक्ष विचलित होऊ देऊ नका, अशा सूचना उद्धव ठाकरेंच्या नवीन मंत्र्यांना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे