भंडारा प्रतिनिधी । भंडारा जिल्हा रूग्णालयाच्या नवजात शिशूकेअर युनिटला लागलेल्या आगीत दहा बालकांचा मृत्यू झाल्याची घटना रात्री घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे. याबाबत जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्याशी देखील उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली असून त्यांनाही तपासाचे निर्देश देण्यात आले आहेत. याचबरोबर भंडाऱ्याच्या घटनेनंतर राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.
‘अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी राज्यातील अन्य रुग्णालयातील शिशू केअर युनिटचे तातडीने ऑडिट करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. याचबरोबर संबंधित दुर्घटेनेस दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन अजित पवार यांनी दिले.
मृत बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत…
याचबरोबर, या घटनेबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दु:ख व्यक्त केले आहे. तसेच, या आगीच्या घटनेची चौकशी करण्यात येईल आणि मृत बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
राहुल गांधींनी ठाकरे सरकारकडे केली ‘ही’ मागणी…
या घटनेबद्दल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही हळहळ व्यक्त केली आहे. ट्विट करत राहुल गांधी म्हणतात, . “भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात आग लागल्याची दुर्दैवी घटना वेदनादायी आहे. जीव गमावलेल्या मुलांच्या कुटुंबांबद्दल माझ्या सहवेदना व्यक्त करतो. जखमी आणि मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने सर्वोतोपरी मदत करावी, असे आवाहन मी करतो.’