पाटणा/ रांची : बिहार व झारखंडमध्ये वीज कोसळल्याच्या घटनांमध्ये किमान ५१ लोक ठार, तर ९ जण जखमी झाले. बिहारच्या सुमारे १२ जिल्ह्य़ांमध्ये एकूण ३९ लोक मृत्युमुखी पडले असून झारखंडच्या ४ जिल्ह्य़ांमध्ये १२ जणांना जीव गमवावा लागला आहे. मंगळवार रात्रीपासून या बळींची नोंद झाली. बिहारमध्ये सर्वात जास्त म्हणजे ८ वीजबळी जमुई जिल्ह्य़ात नोंदवण्यात आले.
याखालोखाल औरंगाबाद जिल्ह्य़ात ७, भागलपूर, बांका व पूर्व चंपारणमध्ये प्रत्येकी ४, रोहतासमध्ये ३, नवाडा, नालंदा व कटिहारमध्ये प्रत्येकी २, तर अरवाल व गया येथे प्रत्येकी एक जण वीज पडून ठार झाला. भागलपूरमध्ये वीज पडल्याने तिघेजण जखमी झाले असून, बांका व जमुई जिल्ह्य़ांमध्ये अशा प्रकारे जखमी झालेल्यांची संख्या प्रत्येकी १ आहे, असे राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले. मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारच्या धोरणानुसार सानुग्रह अनुदान दिले जाईल, तर जखमींवर योग्य उपचार होण्याची निश्चिती केली जाईल अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. झारखंडमध्ये जामताडा जिल्ह्य़ात ६ जण वीज पडून ठार झाले, तर रामगर, पाकुर व दुमका जिल्ह्य़ांत प्रत्येकी २ जण मृत्युमुखी पडले. याशिवाय चार जण जखमी झाले असे पोलिसांनी सांगितले.