पुणे । पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश प्राप्त झालं आहे. भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पुणे-नागपूर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झालेत. हा भाजपाला मोठा धक्का समजला जात आहे. तर औरंगाबाद मतदार संघातही महाविकास आघाडीने विजय मिळवला.
महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विजयावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी भाजपला टोला लगावला आहे. ”पुणे, नागपूर आणि औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातील विजय हा महाविकास आघाडीच्या एकजुटीचा आणि गेल्या वर्षभरात केलेल्या कामाला मतदारांनी दिलेली पावती आहे”, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.
‘नागपूर पदवीधर मतदारसंघ 5 दशकं भाजपकडे होता. गडकरी आणि फडणवीस यांच्याकडे ही जागा गेली अनेक वर्ष होती. पुण्यातील पदवीधर मतदारांनीही आम्हाला समर्थन दिलं नव्हतं. पण यंदा पुण्याचा निकालही मोठ्या मतांनी स्पष्ट झाला आहे. या बदल म्हणजे महाराष्ट्रातील चित्र बदलत आहे. या बदलाला महाराष्ट्रातील लोकांचा पाठींबा आहे, असंच या निकालातून पाहायला मिळत आहे’, असं शरद पवार म्हणाले.