चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
चाळीसगाव येथील नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, राष्ट्रीय सेवा योजना आणि नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण कला,विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठस्तरीय “आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन शिबिर सुरु असून तालुक्यातील पिंपरखेड या पुरग्रस्त गावात रासेयो स्वयंसेवक पुरग्रस्तांसाठी मदत कार्य करीत आहेत .
पिंपरखेड गावाचा तालुक्याशी संपर्क असलेला मुख्य पुल पुराच्या पाण्याने वाहून गेला होता. त्याच्या संपूर्ण भरावाचे काम स्वयंसेवकांनी श्रमदानाने पुर्ण केले. यामुळे गावकऱ्यांची दळणवळणाची सुविधा पुर्ववत झाली तसेच चाळीसगाव बायपास ते वालझेरी हा चार किलो मिटरचा रस्ता पुराचे पाणी दोन्ही बाजूच्या नालीत काटेरी झुडुपांमुळे अडकल्याने संपूर्ण पाणी मुख्य रस्त्यावर अडकून पडले होते. त्यामुळे नागरिकांना चाळीसगाव, वालझेरी, पिंपरखेड, पिंपरखेड तांडा, चंडिकावाडी व पाटणा गाव असा प्रवास करता येत नव्हता.
नागरिकांची ही गैरसोय स्वयंसेवकांनी दूर करण्याचा संकल्प केला व ५ फुट पाण्यात उतरून दोन्ही बाजूच्या नाल्यांमध्ये अडकलेला गाळ व काटेरी झुडपे श्रमदानातून काढले व रस्त्यावर साचलेले पाणी नाल्याद्वारे निघून गेले. रस्ता नागरिकांच्या प्रवासासाठी खुला करण्यात आला. याशिवाय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरखेड ही शाळा डोंगरी नदीच्या काठावर असल्याने ५ फुट पाणी त्यासोबत गाळ, काटेरी झुडुपे शाळेच्या इमारतीत व पटांगणात अडकल्याने शाळा बंद पडली होती.
स्वयंसेवकांनी आपल्या श्रमदानातून शाळेत साचलेला गाळ, काटेरी झुडुपे, लाकडाची ओंडकी दूर करत परिसर स्वच्छ केला आणि शाळा पूर्ववत सुरु झाली. तसेच चाळीसगाव पिंपरखेड तांडा यादरम्यान असलेला एक छोटा सिमेंट पुल (नाल्या वरील ) पाण्याच्या प्रवाहामुळे त्याचा भराव वाहून गेला होता. तो स्वयंसेवकानी श्रमदानातून मुरुमाने भर टाकून प्रवासासाठी खुला केला. आपत्ती काळात राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांतर्फे पुरग्रस्त नागरिकांना , संकटग्रस्तांना आपल्या श्रमदानामुळे मोठा आधार मिळाला असून स्वयंसेवक हे आमच्यासाठी एकप्रकारे देवदूत म्हणून धावून आल्याची भावना सरपंच प्रदिप भोसले यांचेसह ग्रामस्थांनी व्यक्त केली.
कोविड परिस्थितीत आपल्या जिवाची पर्वा न करता ऑनलाईन शिक्षणा सोबतच समाजासाठी काही तरी केले पाहिजे, या प्रामाणिक हेतूने विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने पुरग्रस्त यांचेसाठी सामाजिक कार्य करण्यात येत आहे.
रासेयो स्वयंसेवकांसोबत संचालक डॉ. पंकजकुमार नन्नवरे, प्राचार्य डॉ. एस.आर. जाधव, डॉ. अरविंद सुर्यवंशी, डॉ. राजू निकम तसेच रासेयो विद्यापीठ सल्लागार समिती सदस्य प्रा. डॉ. प्रशांत कसबे (धुळे ) यांनी श्रमदान करुन स्वयंसेवकांचा उत्साह वाढविला. विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू ई वायुनंदन, प्रभारी प्र – कुलगुरू डॉ. बी .व्ही पवार, प्रभारी कुलसचिव डॉ. ए. बी. चौधरी, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीपदादा पाटील व विद्यापीठाचे व्यवस्थापन मंडळ व विविध प्राधिकरण सदस्य यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. एस.आर.जाधव, विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. पंकजकुमार नन्नवरे यांच्या नेतृत्वात शिबीर यशस्वीपणे सुरु आहे. शिबीराच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. आर जाधव, रासेयो संचालक प्रा.डॉ. पंकजकुमार नन्नवरे, प्रा. डॉ. ए. एल. सूर्यवंशी, प्रा. डॉ. आर. पी.निकम, प्रा.मंगला सूर्यवंशी, प्रा. एच. आर. निकम, प्रा. के.पी. रामेश्वरकर, रावसाहेब त्रिभुवन, कैलास चौधरी, ई. एच .गायकवाड, आकाश धनगर, विलास पाटील, सागर कोळी, प्रफुल्ल मेढे, परिक्षित तायडे आदी परिश्रम घेत आहेत.