जळगाव : “मला आता राजकारणात काही अपेक्षा नाही. मात्र उरलेली कामं पूर्ण करायचे आहे,” असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला लगावला आहे. “मी पक्ष सोडत असताना मला दिल्लीवरुन फोन आला होता. त्यावेळी त्यांनी तुम्ही पक्ष का सोडता अशी विचारणा केली होती,” असा खुलासाही यावेळी खडसेंनी केला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खडसेंना राष्ट्रवादी प्रवेशानंतर खूप काही दिलं आहे, अशी टीका केली होती. यावर खडसेंनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे.
“मला राष्ट्रवादीत प्रवेश घेण्याआधी विचारण्यात आलं होतं. तुम्हाला काय पाहिजे. त्यावेळी तुम्ही मला देऊही शकणार नाही. कारण मी आतापर्यंत इतकं काही घेतलं आहे. जवळपास 15 ते 16 मंत्रिपदाचे खाते, विरोधी पक्षनेताही राहिलो आहे. त्यामुळे राजकारणात काहीही अपेक्षा उरलेल्या नाहीत,” असे एकनाथ खडसे म्हणाले. “पण मला काही उरलेली विकासकामे पूर्ण करायचे आहेत,” असेही खडसेंनी सांगितले.