धरणगाव (प्रतिनिधी) : अनंत चतुर्दशीनिमित्त श्रीगणरायांना निरोप देत असताना शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांनी ‘विघ्नहर्ता श्रीगणराया जगावरचं कोरोना संकट दूर कर. सर्वांना सुखी ठेव. सर्वांना उत्तम आरोग्य दे. शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या घरात सुबत्ता येऊ दे.जळगांव जिल्हा सह महाराष्ट्राला आर्थिक संकटातून बाहेर काढून पुन्हा एकदा विकासाच्या वाटेवर नेण्याचं बळ आम्हा सर्वांना दे…’ असं साकडं घातलं आहे. यंदा गणेशोत्सव साधेपणानं, नियमांचं पालन करीत, कोरोनासंसर्ग वाढणार नाही याची काळजी घेत शिस्तबद्ध पद्धतीनं साजरा केल्याबद्दल शिवसेना जळगाव जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांनी गणेशभक्तांचे आभार मानले आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्य चे मा मुख्यमंत्री उध्दव साहेब ठाकरे, गृहमंत्री मा अनिल देशमुख ,यांच्या आदेशानुसार जळगांव जिल्ह्यात अनंत चतुर्दशीनिमित्त यंदा विसर्जन मिरवणूक न काढता गणेशभक्तांनी आपापल्या घरी, सार्वजनिक मंडळांनी त्यांच्या मंडपात किंवा नेमून दिलेल्या ठिकाणी शिस्तबद्ध पद्धतीने गणेशमुर्तींचं विसर्जन केलं. जळगाव जिल्ह्यात दरवर्षी 12 तास चालणारी मिरवणूक यंदा टाळण्यात आली. मानाच्या गणेशमंडळांनी यंदा तीन तासात गणेशमूर्तींचं भक्तीभावाने विसर्जन केलं. गणेशभक्तांची ही कृती बुद्धीदेवतेच्या भक्तांना साजेशी होती. जळगाव शहर ,पाचोरा भडगाव, 40गाव, धरणगाव एरोडोल, पारोळा अमळनेर, चोपडा सह जळगाव जिल्ह्यातील गणेशमंडळांनी सामाजिक जाणीवेतून रक्तदान, प्लाझ्मादान, आरोग्यशिबिरांचं आयोजन करुन गणेशोत्सव साजरा केला. त्याबद्दल आनंद व समाधान व्यक्त करीत शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांनी सर्व गणेशभक्तांचे, गणेश मंडळांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. अनंत चतुर्दशीनिमित्त श्री गणरायांना निरोप देत असताना श्रीगणपती बाप्पांनी पुढच्यावर्षी लवकर यावं, अन् ते येतील तेव्हा महाराष्ट्र व देश कोरोनामुक्त झालेला असेल, असा विश्वासही शिवसेना जळगाव जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांनी दै लोकशाही चे प्रतिनिधी विनोद रोकडे याच्याशी बोलताना व्यक्त केला .