धक्कादायक.. पैशांचा पाऊस पाडण्यासाठी विवाहितेचा बळी

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर अंधश्रद्धेच्या घटना वाढतांना दिसत आहे. यामुळे अनेकांचा निष्पाप बळी देखील गेला आहे.  जळगाव शहरातील शिवाजी नगर भागातील ५१ वर्षीय विवाहित महिला दि. १५ डिसेंबर पासून बेपत्ता झाली होती. याप्रकरणी शहर पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने तपास करीत दोघांना ताब्यात घेतले असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

सदर महिलेचा विदगाव पुलाजवळ खून करून तिला तापी पात्रात जवळ बुजविण्यात आले होते. घटनास्थळी शहर आणि तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी पोहचले असून हा खून जादूटोण्याचा प्रकारातून झाला असल्याची माहिती मिळाली आहे.

जळगाव शहरातील शिवाजी नगर भागातील क्रांती चौकात वास्तव्यास असलेल्या माया दिलीप फरसे (वय ५१) या दि.१५ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० पासून कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेल्या होत्या. नातेवाईकांनी शोधाशोध केल्यानंतर त्या मिळून न आल्याने याप्रकरणी शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान, नातेवाईकांनी दोघांवर संशय व्यक्त केल्याने सोमवारी शहर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते.

शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक गभाळे, उपनिरीक्षक अरुण सोनार, कर्मचारी भास्कर ठाकरे, रतन गिते यांनी दोघांना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. महिलेचा जादू टोण्याच्या प्रकारातून खून करून तिला तापी पात्राजवळ गाडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन प्रत्यक्षात पाहणी केली असता घडलेला प्रकार खरा असल्याचे समोर आले.

नातेवाईक असलेल्या एका तरुणाला एका मांत्रिकाने तुला भरगोस पैसे मिळतील, पैशांचा पाऊस पडेल त्यासाठी एका महिलेचा बळी द्यावा लागेल असे सांगितले होते. मंत्रिकाच्या सांगण्यावरून तरुण महिलेला घेऊन गेला. विदगाव पुलाजवळ तापी नदी पात्रालगत जादूटोणा करीत त्यांनी त्या महिलेचा बळी दिला.

दरम्यान, पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून शहर आणि तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.