नवी दिल्ली :देशात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. देशात अनेक राज्यांत कोरोनाची स्थिती भयावह झाली आहे. त्याचत मृत्यूची संख्याही वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. देशात गेल्या चोवीस तासांत ३ लाख ८६ हजार ४५२ नवे रुग्ण आढळले. तर दिसभरात कोरोनामुळे ३४९८ जणांचा मृत्यू झाला. तसेच २ लाख ९७ हजार ५४० रुग्ण बरे झाले आहेत. जगातील इतर देशांपेक्षा भारतात दिवसेंदिवस सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद होत आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ कोटी ८७ लाख ६२ हजार ९७६ झाली असून, त्यातील १ कोटी ५३ लाख ८४ हजार ४१८ जण बरे झाले. या कोरोना संसर्गाने आतापर्यंत २ लाख ०८ हजार ३३० जणांचा बळी घेतला आहे. देशात कोरोनाच्या उपचाराधीन रुग्णांची संख्या ३१ लाख ७० हजार २२८ इतकी आहे.
देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. कोरोनाची दुसरी लाट देशाला नव्या संकटाच्या गर्तेत ढकलताना दिसत आहे. बेड, ऑक्सिजन आणि वेळेत उपचार न मिळाल्याने दररोज हजारो भारतीयांना प्राण गमावावे लागत आहे. देशात मृत्यूचे तांडवच सुरू असून, अनेक राज्यांमध्ये रुग्णालयांपासून ते स्मशानभूमीपर्यंत रांगा लागलेल्या दिसत आहेत.
दरम्यान, जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. चीनमधून वेगाने जगभरात पसरलेल्या कोरोनाचा फटका जवळपास सर्वच देशांना बसला आहे. जगातील कोरोना रुग्णांची संख्या ही आता तब्बल १४ कोटींच्या पुढे गेली असून लाखो लोकांना यामुळे जीव गमावला आहे. तर अनेक देशांमधील परिस्थिती कोरोनामुळे गंभीर झाली आहे.