भुसावळ, प्रतिनिधी
धुळे, जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे चौपदरीकरणाचे काम जोरात सुरू आहे. त्यातील तरसोद ते भुसावळ राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू असून सदर तरसोद ते भुसावळ पर्यंतचे काम अंतिम टप्प्यात पोहोचलेले आहे. या महामार्गावर नशिराबाद ओलांडल्यावर सिमेंट फॅक्टरीच्या जवळच टोल नाका उभारला जात आहे.
त्याठिकाणी पथदिवे आणि हाय मस्ट लॅम्प लावण्यात आलेले आहे. कर्मचाऱ्यांचे ऑफिस आणि रहिवाशांसाठीच्या इमारतींना रंगरंगोटी सुद्धा करण्यात आलेली आहे. टोल वसुलीच्या केबिन सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन , वगैरे महत्वाची कामे जवळपास पूर्ण आहेत. त्यामुळे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा टोलनाका सुरू होण्याची दाट शक्यता आहे. सदर राष्ट्रीय महामार्गावर रोज लाखो वाहनांची वर्दळ होणार असून त्यासाठी या महामार्गाच्या वापरासाठी ऑगस्टपासून पैसे मोजावे लागणार आहेत.
राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम ज्या कंपनीला मिळाले आहे. सदर कंपनीकडून अशा सर्व लाखो वाहन धारकांकडून, चालकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिदिवस टोल वसुली केली जाणार आहे. महाराष्ट्रात बऱ्याच टोल नाक्यांवर संबंधित टोल असलेल्या परिसर व जिल्ह्यातील स्थानिक लोकांना रहिवाशांना 75 ते 80 टक्के टोल माफी आहे.
याचप्रमाणे महाराष्ट्रातील आपल्या जळगाव जिल्ह्यातुन जाणाऱ्या तरसोद ते चिखलि या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचा ठेका घेतलेल्या कंपनीकडून जळगाव जिल्ह्यातील स्थानिक वाहनधारकांना सदर राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या टोल नाक्यानवर 80% टोल माफी मिळावी . सर्व प्रकारच्या थ्री व्हीलर्स, विविध सामाजिक संस्थांच्या उपक्रमात सहभागी असणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना , सर्व प्रकारच्या रुग्णवाहिका, सर्व प्रकारच्या अध्यात्मिक पदयात्रा व त्यात असलेल्या वाहनांना पूर्णपणे टोलमाफ करावा. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व भारतीय जनता पार्टीचे शिशिर जावळे यांनी केंद्रीय वाहतूक रस्ते व परिवहन मंत्री माननीय श्री नितीन गडकरी, तथा स्थानिक प्रकल्प प्रमुख चंद्रकांत सिंह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडे केली असून , सदर मागणी मान्य न झाल्यासयाविरुद्ध तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे शिशिर जावळे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.