जळगाव । जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे तापमानात मोठी घट झाली होती. मात्र आता उत्तर महाराष्ट्र व विदर्भावर तयार झालेला हवेच्या कमी दाबाचा पट्टा पुढे सरकल्याने उत्तर पश्चिमेकडून येणारे उष्ण वारे सक्रीय झाल्याने अचानक तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात उष्णतेची लाट निर्माण झाली असून तापमानाचा पारा अचानक 44.3 अंशावर पोहचला.
वाढत्या तापमानाचा जळगावकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मागील आठवड्यात जिल्ह्यात अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली त्यामुळे तीन दिवस ढगाळ वातावरण होते. यामुळे तापमानात ६ ते ७ अंशाची घट होवून ४३ अंशावर गेलेला पारा ३६ अंशावर आला होता. त्यामुळे काही दिवस का असेना नागरिकांना प्रचंड उष्णतेपासून दिलासा मिळाला होता. मात्र, आता जिल्ह्यात सर्वत्र कोरडे हवामान पहायला मिळत असून, वातावरणातील आर्द्रता देखील कमी झाली असल्याने तापमानात वाढ होणार आहे. सकाळपासून उन्हाचे चटके जाणवू लागत असल्याने शहरवासीय चांगलेच घामाघुम झाले आहे.