जिल्हा बँक निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनेलचा फज्जा!

0

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह. बँक निवडणूक घोषित झाल्यानंतर सहकारात राजकारण नको म्हणून सर्वपक्षीय पॅनेल तयार करून निवडणुकीत होणारा खर्च टाळण्यासाठी काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आदल्या दिवसांपर्यंत सर्वपक्षीय पॅनेलबाबत चर्चा सुरू होती. काँग्रेसने भाजपबरोबर सहभागी होणार नाही, त्यामुळे काँग्रेसने पॅनेलमधून बाहेर पडण्याची भूमिका जाहीर केली होती. तथापि आज उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या आदल्या दिवसांपर्यंत बैठक घेऊन ही निवडणूक सर्वपक्षीय पॅनेलतर्फे लढविण्याचा प्रामाणिक प्रयत्न पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केला. अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आले नाही.

आज उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपने सर्व 21 जागांवर आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. भाजपने या सर्व जागा सर्व ताकदनिशी लढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे भाजपतर्फे अधिकृतपणे माजी मंत्री गिरीश महाजन आणि जिल्हा सरचिटणीस नवल पाटील यांनी पत्रकारांना सांगितले. आ. गिरीश महाजन यांनी स्वत: जामनेर तालुका सोसायटी मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मागील पाच वर्षे गिरीश महाजन हे बँकेचे संचालक म्हणून कार्यरत होते. बाकी 21 जागांवर भाजप आपले उमेदवार जाहीर करणार आहे. त्यामुळे सर्वपक्षीय पॅनेल तयार करून निवडणुकीचा खर्च टाळण्याचा प्रयत्न मात्र फसला. सर्वपक्षीय पॅनेलचा प्रयत्न फसणार हे आम्ही या आधीच जाहीर केले होते. कारण भाजपचे आ. गिरीश महाजन आणि माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे हे एकत्र राहूच शकत नाही. एका मॅनमध्ये दोन तलवारी जशा राहू शकत नाही.  तद्वत एकनाथराव खडसे आणि गिरीश महाजन एकत्र राहू शकत नाही. त्याची झलक सर्वपक्षीय बैठकीत दिसून येत होती. कारण त्यांचे एकमेकांकडे न पहाता टोमणे मारणे हा प्रकार सर्वांच्या लक्षात येत होता. त्याचबरोबर सर्वपक्षीय कोअर कमेटीच्या बैठकीला नियोजित वेळेवर आ. गिरीश महाजन कधीच पोहोचले नाही. अर्धा तास -एक तास उशीरा बैठकीला गिरीश महाजनांची उपस्थिती सर्वांनाच खटकत होती. शेवटी व्हायचे ते झाले.

जिल्हा बँक  निवडणुकीत भाजपचे लक्ष्य खडसे कुटूंबीय  असणार आहे. विद्यमान चेअरमन ॲड.रोहिणी खडसे या बँक संचालक म्हणून निवडूनच येणार नाही अशी व्युहरचना आखण्यात येत आहे. त्यामुळे रोहिणी खडसेंच्या विरोधात त्यांच्या भावजयी खा. रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नणंद भावजयीमध्ये लढाई लावली जाणार आहे. अशी लढाई झाली तर ती निवडणूक राज्यात लक्ष्यवेधी ठरणार आहे. संपूर्ण राज्याचे या नणंद भावजयीच्या निवडणुकांकडे लक्ष वेधणार आहे. महिला मतदार संघातून निवडणूक लढविली गेली तर जिल्ह्यातील महिला मतदार राहणार असल्याने निवडणूक चुरशीची होवून पैशाची उधळपट्टी मोठ्या प्रमाणावर होणार आहे. जर बोदवड तालुका सोसायटी मतदार संघातून सुध्दा ॲड. रोहिणी खडसे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याच बोदवड तालुका सोसायटी मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्रभैय्या पाटील यांनी सुध्दा उमेदवारी दाखल केलेली आहे. त्यामुळे ॲड. रविंद्र भैय्या पाटील यांनी आपली उमेदवारी मागे घेतली तर ॲड.रोहिणी खडसे सहज विजयी होवू शकतात. त्यामुळे भाजपची जी व्युहरचना आहे ती मात्र फेल होवू शकते.

येत्या 8 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख आहे. त्यादिवशी कोण कोण उमेदवार रिंगणार राहतील हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माघार घेण्याचा 3 आठवड्याचा कालावधी फार मोठा आहे. हा फार मोठा कालावधी ठेवायला नको होता. ज्यांनी उमेदवारी दाखल केलेली आहे. परंतु निवडून येण्याची त्यांना शाश्वती नसेल त्यांनी निवडून येणाऱ्या संभाव्य उमेदवारांशी जुळते घेवून आपली उमेदवारी माघारी घेण्याचा प्रकार होवू शकतो. या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यांनी आपली उमेदवारी मागे घेण्यासाठी स्वतःची चांदी करून घेतली एवढे मात्र निश्चित.

भुसावळ मतदार संघातून भाजपतर्फे आ.संजय सावकारे यांनी सुध्दा आपली उमेदवारी दाखल केली आहे. परंतु संजय सावकारे हे भाजपचे जरी असले तरी त्यांचेवर एकनाथराव खडसेंचे समर्थक म्हणून या आधीच शिक्कामोर्त झालेले आहे. त्यामुळे कदाचित संजय सावकारे निवडून आले तर ते खडसे गटाला समर्थन देतील असा सर्वांचा कयास आहे. बँकेच्या एकूण 29 जागांपैकी ज्यांचेकडे 11 जागा विजयी होतील त्यांचा चेअरमन राहील. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी पारोळा तालुका सोसायटी मतदार संघातून विद्यमान संचालक चिमणराव पाटील, त्यांचे सुपुत्र अमोल पाटील हे एरंडोल तालुक्यात सोसायटी मतदार संघातून आणि विद्यमान संचालक संजय पवार धरणगाव सोसायटी मतदार संघातून बिनविरोध निवडून येणार आहे. कारण या तिनही मतदार संघात त्यांच्या विरोधात एकही अर्ज नाही म्हणजे त्यांची बिनविरोध निवड होणार आहे. राहिलेल्या 17 जागांपैकी बोदवडची जागा राष्ट्रवादी, चोपड्याची काँग्रेस अथवा राष्ट्रवादी, पाचोऱ्याच्या जागेवर शिवसेना निश्चितपणे विजयी होणार असे मानले जात आहे. त्यामुळे भाजप हा जरी सर्व जागा लढवित असेल तर 11 जागांपर्यंत मजल मारण्यासाठी त्यांना फार परिश्रम करावे लागणार आहेत. निवडणूकीचे चित्र येत्या 8 नोव्हेंबरला स्पष्ट होणार असले तरी आज मात्र राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेसचे वर्चस्व दिसून येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.