जामनेर (प्रतिनिधी):– शहरातील शिवजयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात वाद्य बंद करण्यावरून दोन गट आमने – सामने आल्यामुळे वादविवाद निर्माण झाला होता. परंतु आ.गिरीश महाजन यांनी मध्यस्थी करून दोघ गटातील पदाधिकाऱ्यांची समजूत घालून सदर वाद मिटविला.
शहरातील राजमाता जिजाऊ चौकात वाकी रोड वरील छ.शिवाजी महाराज प्रतिष्ठानतर्फे ढोल ताशा पथक आपले कला कौशल्य सादर करीत असताना सोनबर्डी वरून सुरुवात झालेली मोटर सायकल रॅली नगरपालिका चौकात येऊन धडकली तेव्हा रॅलीच्या आयोजकांनी प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांना ढोल ताशा पथक बंद करण्याची विनंती केल्याने दोघ गट आमने सामने आल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.परंतु आ.गिरीष महाजन व पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी तात्काळ हस्तक्षेप करून मध्यस्थी केली. व सदर वाद मिटविला.
राजमाता जिजाऊ चौकात सर्वपक्षीय सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष साधना महाजन,जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील,उपनगराध्यक्ष प्रा.शरद पाटील,गटनेते डॉ.प्रशांत भोंडे,नगरसेवक बाबुराव हिवराळे,आतिष झाल्टे,शेख अनिस शेख बिस्मिल्ला,कैलास पालवे,दत्तू काळे,सदाशिव माळी,खलील भांजा,शेख रिजवान,राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेश सचिव वंदना चौधरी, अशोक चौधरी,प्रल्हाद बोरसे,दिपक महाराज,सुनिल पाटील ,नरेंद्र जंजाळ,भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष एस.टी .पाटील,दशरथ पाटील,अमोल पाटील,माधव चव्हाण, जितेश पाटील आदींसह उत्सव समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळेस मुस्लिम समाज बांधवांनी कार्यक्रमातील शिवप्रेमींना पिण्याचे पाणी वाटप करून एकोप्याचे दर्शन घडविले तर काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे,सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश काळे, उपनिरीक्षक किशोर पाटील,अंबादास पाथरवड यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.