जम्मू काश्मीरमधील राजौरी सेक्टरमध्ये दहशतवाद्याविरोधात लढताना लष्कराच्या एका अधिकाऱ्यासह चार जवान शहीद झाल्याची दुख:द घटना समोर आली आहे.
जम्मू -काश्मीरच्या पीर पंजाब रेंजमधील राजौरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांविरोधात जवांनाचे सर्च ऑपरेशन सुरु होते. यावेळी दहशतवादी आणि भारतीय लष्करामध्ये चकमक झाली. दरम्यान दहतवाद्यांच्या हल्ल्यात लष्कराचे ज्युनिअर कमिशन ऑफिसर (जेसीओ) आणि ४ जवानांना वीरमरणं आले आहे. यापूर्वी आज अनंतनाग आणि बांदीपोरा जिल्ह्यात सुरक्षा दलांशई झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात भारतीय जवानांना यश मिळाले आहे. मात्र यावेळी एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे.
A junior commissioned officer (JCO) & four soldiers killed in action during a counter-terrorist operation in the Rajouri sector in the Pir Panjal ranges: Sources
— ANI (@ANI) October 11, 2021
अजूनही भागात भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरुच आहे. सुरक्षा दलांना पुंछ सेक्टरमध्ये काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. यादरम्यान ही घटना घडली. याशिवाय भारतीय सुरक्षा दलांनी अनंतनाग जिल्ह्यातील वेरीनाग भागातील खगुंड येथे घेरावा घालत दहशतवाद्यांविरोधात शोधमोहीम सुरू केली आहे.
दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. या गोळीबाराला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. मात्र मागील काही दिवसांपासून भारतीय लष्कराने जम्मू आणि काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात ठोस पावले उचलली आहेत. त्याअंतर्गत विविध भागात दहशतवाद्यांविरोधात सर्च ऑपरेशन केलं जात आहे.
मात्र दहशतवाद्यांनी आता काश्मीरमधील सामान्य नागरिकांना लक्ष्य केले आहे. यादरम्यान काश्मीरमधील सांप्रदायिक आपलेपणा नष्ट करण्यासाठी सामान्य नागरिकांवर हल्ले केले जात आहते. य़ाशिवाय समाजासमाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी गेल्या आठवड्यात दहशतवाद्यांनी काश्मीरी पंडित, हिंदू आणि शीख समुदायाच्या नागिरकांना लक्ष्य केले. यात जवळपास ७ नागरिकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने देखील चिंता व्यक्त केली.
दरम्यान, सुरक्षादलाने रविवारी काश्मीरमध्ये कारवाई करत लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद, अल बद्र आणि द रेझिस्टन्स फ्रंट या दहशतवादी संघटनांशी संबंधित ९०० जणांना ताब्यात घेतले. दहशतवादाला समर्थन दिल्याच्या संशयावरून लष्कराने ही कारवाई केली आहे अशी माहिती जम्मू काश्मीरच्या पोलिसांनी दिली.