नवी दिल्ली – देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. याच दरम्यान आरोग्य विम्याचे महत्त्व लोकांना समजलं आहे. याचा परिणाम म्हणजे मे महिन्यात आरोग्य विम्यात आतापर्यंत केवळ 57 टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. फक्त खासगी कंपन्याच नव्हे तर लोकांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी मोदी सरकारने 2015 पासून एक योजना लागू केली आहे. देशातील गरजुंना आरोग्य संरक्षण पुरविणे हा या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे सरकारने प्रीमियमही नाममात्र ठेवले आहे. मोदी सरकारच्या या योजनेचं प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा विमा योजना असं नाव आहे.
सरकारच्या या योजनेच्या माध्यमातून देशातील निम्न उत्पन्न गटातील लोकांना फायदा होत आहे. या सरकारी योजनेचा प्रीमियम संपूर्ण वर्षासाठी केवळ 12 रुपये आहे, म्हणजेच महिन्याला फक्त 1 रुपया. या योजनेद्वारे सरकार गरीब आणि गरजूंना कठीण काळात विमा सुविधा प्रदान करत आहे. कोरोना काळात केंद्र सरकारची ही योजना तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. PMSBY अंतर्गत विमा सुविधा उपलब्ध आहे, जेणेकरून कमी उत्पन्न गटांनाही खर्च न करता उपचार मिळू शकतील. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेची प्रीमियम रक्कम खातेधारकाच्या बचत खात्यातून बँकांकडून ऑटो डेबिट सुविधेद्वारे जमा केली जाते. कोणतीही व्यक्ती केवळ एका बचत खात्याद्वारे या योजनेस पात्र असेल.
महिन्याला 1 रुपयात 2 लाखांचा विमा
18-70 वयोगटातील लोक प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा विमा योजनेसाठी अर्ज करू शकतात. योजनेचा लाभ घेण्यासाठी बचत खाते असणे बंधनकारक आहे. या योजनेंतर्गत विमा घेणाऱ्याचा मृत्यू, अपघात किंवा संपूर्ण अपंगत्व आल्यास 2 लाख रुपयांचा अपघात विमा दिला जातो. कायमस्वरुपी अर्धांगवायू आल्यास एक लाख रुपयांचे संरक्षण पुरवलं जातं. 18 ते 70 वर्षे वयोगटातील भारतीय केवळ 12 रुपये वार्षिक प्रीमियम देऊन PMSBY चा फायदा घेऊ शकतात.
आपल्याला या योजनेंतर्गत पॉलिसी घ्यायची असल्यास आपण थेट कोणत्याही बँकेत जाऊन या योजनेसाठी अर्ज करू शकता. या व्यतिरिक्त इतरही मार्ग आहेत, ज्याद्वारे आपण ही पॉलिसी घेऊ शकता. यामध्ये बँक मित्र, विमा एजंट आणि सरकारी आणि खासगी विमा कंपन्यांचा समावेश आहे. त्याचे प्रीमियम थेट आपल्या बँक खात्यातून डेबिट केले जाते. कोरोनासारख्या कठीण काळात ही योजना ज्यांचे उत्पन्न खूपच कमी आहे आणि जे आपल्या पैशांवर उपचार घेऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी ही एक वरदान आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.