लोकशाही न्युज नेटवर्क-
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकांमुळे तमाम मराठी माणसांच्या हृदयात आदराचं स्थान पटकावणारे ख्यातनाम अभिनेते, शिरूरचे खासदार आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी अभिनयातून संन्यास घेण्याचे संकेत दिले आहेत. शिरूरच्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढची 5 वर्षं अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेणार असल्याचं कोल्हेंनी स्पष्ट केलं. दरम्यान, अमोल कोल्हेंच्या अभिनय क्षेत्रावरून अजित पवार, आढळरावांकडून सडकून टीका होतेय. तुम्हाला कार्यसम्राट खासदार पाहिजे की नटसम्राट खासदार पाहिजे? असा सवालही केला जातोय.
राजकीय परिस्थितीवर भाष्य करत असताना खासदार अमोल कोल्हे यांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील विरामाविषयीचा प्रश्न विचारण्यात आला. याचा अर्थ तुम्ही ब्रेक घेणार आहात असं आता समजायचं का आम्ही? त्याचं उत्तर देत ते म्हणाले, ”नाही, नक्कीच माझ्या उत्तरातून तुम्हाला हे कळलं असेल की हे सगळे प्रोजेक्ट्स मार्गी लावायचे असतील, तर मग अभिनय क्षेत्राला खूप जास्त वेळ मिळणं हे फार अवघड आहे. त्याचमुळे हे प्राधान्य ठरवावं लागेल कारण मायबाप जनतेनं ठरवलंय की या पद्धतीनं पुन्हा विश्वास माझ्यावर ठेवायचा आणि त्यासाठी ब्रेक घ्यावा लागला तरी मला वाटतं की हे प्रश्न आधी मार्गी लागणं महत्वाचं आहे असे त्यांनी सांगितले