चाळीसगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चाळीसगाव शहरातील रिक्षांमध्ये ड्रायवर व पॅसेंजर यांच्यामध्ये प्लास्टिक कागद लावलेला नसल्यामुळे रिक्षा चालकांवर शहर वाहतूक विभागाकडून आज सकाळ पासून कारवाई करण्यात येत होती व रिक्षा चालकांकडुन दंड आकारण्यात येत होता. सध्या कोविडमुळे लॉकडाऊन च्या परिस्थितीत आधीच आर्थिक विवंचनेत असलेल्या सर्व रिक्षा चालकांना हा काळात तेरावा महिनाच होता.
सदर दंडात्मक कारवाई सुरू करून जवळपास ५० रिक्षा जमा करण्यात आल्या. या कारवाईने भीतीत असणाऱ्या सर्व रिक्षा चालकांनी आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्याकडे धाव घेतली व त्यांची व्यथा मांडली.
यानंतर आमदार मंगेश दादांनी वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश सदगीर यांना बोलवून घेतले व सर्व रिक्षाचालकांची सद्यस्थिती मांडली. कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता जिल्हाधिकारी यांचे आदेश असल्याने आम्हाला ही कारवाई करावी लागत असल्याचे एपीआय सदगीर यांनी सांगितले.
तर लॉकडाऊन मुळे आम्ही आर्थिक अडचणीत आहोत, शासनाने जाहीर केलेली मदत देखील अजून आम्हाला मिळाली नसल्याने आम्हाला हा खर्च परवडत नसल्याचे सर्व रिक्षाचालकांनी सांगितले.
वरील सर्व बाबींचा विचार करून आमदार मंगेशदादा यांनी सांगितले की आज राज्याचे नेते, माजी मंत्री गिरीषभाऊ महाजन यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने मी स्वखर्चातून चाळीसगाव शहरातील सर्व रिक्षा चालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्लास्टिक कागद लावून देत असल्याचे जाहीर केले व केवळ आश्वासन न देता तात्काळ प्लास्टिक कव्हर्स मागवून ज्या ठिकाणी रिक्षा जमा करण्यात आल्या होत्या त्याठिकाणी प्रत्यक्ष रिक्षा चालकांना वितरित देखील केले. वाहतूक शाखेने देखील आमदारांच्या सूचनेनुसार सर्व जमा रिक्षा समज देऊन सोडून देण्यात आले. अडचणीच्या वेळी कष्टकरी रिक्षाचालकांच्या मदतीला आमदार मंगेशदादा चव्हाण धावून आल्याने सर्व रिक्षा चालकांनी त्यांचे आभार मानले.
यावेळी भाजपा तालुका उपाध्यक्ष भैय्यासाहेब पाटील, नगरसेवक भास्कर पाटील, सरचिटणीस योगेश खंडेलवाल, कैलास नाना पाटील, राहुल पाटील, संता पैलवान, अनिल कापसे व सर्व रिक्षाचालक उपस्थित होते.