जळगाव : जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकरणी सत्र न्यायालयाने शिक्षा ठोठावलेल्या ११ जणांच्या जामीन अर्जांवर आज दि. ६ रोजी औरंगाबाद खंडपीठात कामकाज होणार आहे.
सुरेश जैन यांनी दाखल केलेले अपील सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केले असून, त्यांचे आणि राज्य शासनाचे अपील मुंबई उच्च न्यायालयाकडे हस्तांतरित करण्याचा आदेश दिला असल्याचे जैन यांच्या वकिलांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले; मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत मिळाली नसल्याचे त्यांनी खंडपीठास सांगितले. त्यावर उर्वरित १० जणांनी सुद्धा त्यांचे जामीन अर्ज मुंबईला हस्तांतरित करण्याची विनंती खंडपीठास केली. त्याला विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी विरोध केला. या प्रकरणात जैन यांच्यातर्फे अॅड. सत्यजित एस. बोरा आणि इतरांतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ व्ही. डी. होन, अॅड. अश्विन होन, अॅड. महेश एस. देशमुख, अॅड. बी. आर. वर्मा, अॅड. आर. आर. मंत्री, अॅड. व्ही. डी. सपकाळ, अॅड. राजेंद्र देशमुख काम पाहत आहेत.